konkandhara.com

राजकारण

'मोसाद' पॅटर्न, बदललेली पाण्याची बाटली आणि वैमानिकाचा ट्रॅक रेकॉर्ड; अजित पवारांच्या निधनाबाबत रोहित पवारांचे खळबळजनक दावे

‘मोसाद’ पॅटर्न, बदललेली पाण्याची बाटली आणि वैमानिकाचा ट्रॅक रेकॉर्ड; अजित पवारांच्या निधनाबाबत रोहित पवारांचे खळबळजनक दावे

Written By : विवेक ताम्हणकर बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न असतानाच, आमदार रोहित पवार यांनी या घटनेमागे मोठ्या घातपाताची शक्यता वर्तवून खळबळ उडवून दिली आहे. हा केवळ अपघात नसून एक पूर्वनियोजित कट असू शकतो, असा संशय त्यांनी एका सादरीकरणाद्वारे (प्रेझेंटेशन) उपस्थित केला. “माझा काका आणि राज्याचा मोठा नेता गेला आहे, आम्हाला उत्तरे मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या निधनापूर्वीच्या काही दिवसांतील त्यांच्या बदललेल्या वागणुकीवर प्रकाश टाकला. त्यांच्या दाव्यानुसार, अजित पवारांना स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल काहीतरी शंका येत असावी, असे त्यांच्या कृतीतून दिसत होते. दादांनी अलीकडच्या काळात आपली पिण्याच्या पाण्याची बाटली बदलली होती. इतकेच नव्हे तर, त्यांनी एका जवळच्या मित्राला स्वतःचे विमान खरेदी करण्याचा सल्ला दिला होता आणि मि त्याना माझ्या मित्राने हेलीकॉप्टर घेतल्याचे सांगितले, “जर मित्र विश्वासू असेल, तर त्याच्याच हेलिकॉप्टरमधून फिरत जा,” असा सल्लाही त्यांनी आपल्याला दिला होता. यावरून त्यांना भविष्यात काहीतरी दगाफटका होऊ शकतो याची चाहूल लागली होती का, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला. यावेळी रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत अलीकडच्या काळात अजित पवार वापरत असलेली पाण्याची अत्यंत सुरक्षित बाटलीही दाखविली.  रोहित पवार यांनी या अपघाताचा संबंध इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’च्या कार्यपद्धतीशी जोडला. मोसादच्या पुस्तकाचा संदर्भ देत ते म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला संपवण्यासाठी त्याच्या चालक किंवा वैमानिकाला आपल्या बाजूने वळवणे किंवा त्याला लक्ष्य करणे हा सर्वात सोपा मार्ग असतो. या प्रकरणातील मुख्य वैमानिक सुमित कपूर याच्या ट्रॅक रेकॉर्डवर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कपूर हा मद्यपान केल्याप्रकरणी तीन वर्षे निलंबित होता. अशा वादग्रस्त पार्श्वभूमीच्या वैमानिकावर कोणाचा दबाव होता का आणि त्याने मुद्दाम अवघड रनवेची निवड का केली, याकडे रोहित यांनी लक्ष वेधले. याशिवाय, तांत्रिक बाबींवर बोट ठेवताना रोहित पवार यांनी अनेक विसंगती मांडल्या. विमान उड्डाणाची वेळ, पायलट आणि नियोजित दौरा ऐनवेळी का बदलला? एटीसी (ATC) ट्रान्सस्क्रिप्ट आणि केंद्रीय विमान मंत्रालयाच्या अहवालातील वेळेत फरक का आहे? खराब दृश्यमानता असूनही लँडिंगचा धोका का पत्करला आणि विमानाचा ट्रान्सपॉन्डर (Transponder) नेमका कोणाच्या सूचनेवरून बंद होता की केला होता? मृत्यू समोर दिसत असतानाही मुख्य वैमानिक गप्प का होता, हे प्रश्न उपस्थित करून त्यांनी या घटनेच्या मुळाशी जाण्याची मागणी केली आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने तपासाच्या विश्वासार्हतेवरही त्यांनी शंका व्यक्त केली असून, हा विमान क्रॅश करण्याचाच कट होता का, असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.

‘मोसाद’ पॅटर्न, बदललेली पाण्याची बाटली आणि वैमानिकाचा ट्रॅक रेकॉर्ड; अजित पवारांच्या निधनाबाबत रोहित पवारांचे खळबळजनक दावे Read More »

राज्य मंत्रिमंडळ बैठक: 19 निर्णय; क्रीडा, सिंचन, आरोग्याला गती

राज्य मंत्रिमंडळ बैठक: 19 निर्णय; क्रीडा, सिंचन, आरोग्याला गती

मंत्रिमंडळ बैठक: 19 महत्त्वाचे निर्णय; विकासकामांना वेग मुंबई | कोंकणधारा डेस्क:राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या बैठकीत एकूण 19 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या सुरुवातीला भावनिक वातावरण होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती जाणवली, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रथमच मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली. या बैठकीत काही निर्णय हे अजित पवार यांच्या कार्यकाळात प्रस्तावित असलेल्या प्रकल्पांशी संबंधित असल्याने त्यांना प्राधान्याने मंजुरी देण्यात आली. त्यात बारामती जिल्हा क्रीडा संकुलासाठी 75 कोटी 13 लाख रुपये मंजूर करण्यात आले. 🗂️ मंत्रिमंडळ बैठकीतील 19 महत्त्वाचे निर्णय (ठळक मुद्दे) सिंचन प्रकल्पांना गती:नाबार्ड कडून 15,000 कोटींचे दीर्घ मुदतीचे कर्ज. 57 अपूर्ण सिंचन प्रकल्प व 193 प्रकल्पांच्या वितरण प्रणालीत सुधारणा; 8 लाख हेक्टर क्षेत्राला सिंचन. (जलसंपदा) कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम:करवीर तालुक्यात 12 हेक्टर 76 आर शासकीय जमीन उपलब्ध. (महसूल) पुरंदर विमानतळ:विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना; भूसंपादन व अनुषंगिक कामांसाठी 6,000 कोटींचे कर्ज; एमआयडीसी, एमएडीसी, सिडको सहभाग. (उद्योग) ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान:2026–27 कालावधी; वार्षिक 80.75 कोटींची तरतूद; ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद स्तरावर पुरस्कार. (सार्वजनिक आरोग्य) एमआयडीसी—रत्नपुरी मळा (इंदापूर):1,000 एकर जमीन नव्या औद्योगिक वसाहतीसाठी हस्तांतरण. (महसूल) मुंबईत महाटेनिस पायाभूत सुविधा:म्हाडाच्या भूखंडांवर संयुक्त भागीदारीत विकास. (गृहनिर्माण) अटल सेतू प्रभाव क्षेत्र विकास धोरण:नव नगर विकास प्राधिकरण क्षेत्रात भूसंपादन व भूवाटप धोरणास मान्यता; ‘तिसरी मुंबई’ला गती. (नगर विकास) राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन बक्षिसांत वाढ:विद्यार्थी, शिक्षक, प्रयोगशाळा परिचरांना लाभ. (शालेय शिक्षण) PPP धोरण–2026:25 कोटींपेक्षा मोठ्या प्रकल्पांना मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीकडून मंजुरी; नियोजन विभागात स्वतंत्र कार्यासन. (नियोजन) ई-मेल नोटीस वैध:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मध्ये दुरुस्ती. (महसूल) परभणी—इंद्राणी सहकारी सूतगिरणी:शासन अर्थसहाय्य. (वस्त्रोद्योग) अपर जिल्हाधिकारी पदनिर्मिती:11 पदांना मान्यता. (महसूल व वन) नागपूर—कोल टू केमिकल प्रकल्प:117.19 हेक्टर जमीन एमआयडीसीला. (महसूल) बारामती क्रीडा संकुल (कटफळ):75.13 कोटींची मंजुरी; पॅव्हेलियन, जलतरण तलाव, स्केटिंग रिंग, आर्चरी, बास्केटबॉल. (शालेय शिक्षण व क्रीडा) धान्य वितरण—एकत्र निविदा प्रक्रिया:मुंबई–ठाणे क्षेत्रातील 5 परिमंडळे व 34 जिल्ह्यांत सुसूत्रता. (अन्न व नागरी पुरवठा) अकोला—लघू पाटबंधारे दुरुस्ती:6.60 कोटी; 255 हेक्टर सिंचन. (मृद व जलसंधारण) कर थकबाकी तडजोड अध्यादेश:कर, व्याज, दंड/विलंब शुल्काबाबत सुधारणा. (वित्त) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दुरुस्ती:कलम 109(3)(घ). (उच्च व तंत्र शिक्षण) खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियम दुरुस्ती:प्रवेश व शुल्क विनियमनात सुधारणा. (उच्च व तंत्र शिक्षण) आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांमुळे सिंचन, आरोग्य, उद्योग, क्रीडा व शहरी विकास या क्षेत्रांना चालना मिळणार आहे. निवडणुकांनंतरच्या पहिल्या महत्त्वाच्या बैठकीत व्यापक विकासाचा अजेंडा पुढे नेण्यात आल्याचे चित्र स्पष्ट झाले. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

राज्य मंत्रिमंडळ बैठक: 19 निर्णय; क्रीडा, सिंचन, आरोग्याला गती Read More »

mahad election

महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व; जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ताब्यात

महाड | कोंकणधारा डेस्क:महाड तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्हा परिषदेच्या पाचही गटांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले, तर पंचायत समितीच्या दहा पैकी नऊ जागांवर या गटाने विजय मिळवला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी पराभव मान्य करत मतमोजणी केंद्रातून निघून जाणे पसंत केले. जिल्हा परिषद गटांचे निकाल महाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच गटांमध्ये खालील उमेदवार विजयी ठरले— या निकालांमुळे जिल्हा परिषदेवर शिवसेना शिंदे गटाची पकड अधिक मजबूत झाली आहे. पंचायत समितीवर नऊ जागांवर विजय पंचायत समितीच्या गणांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या खालील उमेदवारांनी विजय मिळवला याशिवाय सवाने पंचायत समिती गणातील अनिल जाधव हे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. दरम्यान, बिरवाडी पंचायत समिती गणात मयूर पुंडलिक जाधव यांनी विजय मिळवत राष्ट्रवादी–भाजप आघाडीचे एकमेव खाते उघडले आहे. चुरशीच्या लढतीत निर्णायक विजय या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष वेधून घेणाऱ्या लढतींपैकी नडगाव तर्फे बिरवाडी जिल्हा परिषद गट महत्त्वाचा ठरला. येथे राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास भरत गोगावले यांनी तब्बल पाच हजार मतांची आघाडी घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निलेश महाडिक यांचा दारुण पराभव केला. त्याचप्रमाणे करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असलेल्या निलेश ताठरे यांनी सतत चर्चेत असलेले सोमनाथ ओझर्डे यांचा पराभव करत विजय संपादन केला. निवडणूक जिल्हा परिषदेची, गुलाल विधानसभेचा महाड नगरपालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी सुनील तटकरे यांनी भाजपसोबत युती करत ताकद लावली होती. मात्र, मजबूत जनसंपर्क असलेल्या मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा महाड–पोलादपूर तालुक्यावर आपली पकड कायम असल्याचे दाखवून दिले. नगरपालिका निवडणुकीनंतर दोन गटांत झालेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर विकास गोगावले यांचा हा विजय प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. मात्र मोठ्या मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर महाडमध्ये विधानसभा निवडणुकीप्रमाणे गुलाल उधळण्यात आला. राष्ट्रवादी बॅकफूटवर; ठाकरे गटाची मते स्थिर या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहल माणिकराव जगताप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, त्याचा पहिला फटका महाड नगरपालिकेत बसल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही त्यांच्या कुटुंबाची राजकीय ताकद कमी झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मते तुलनेने स्थिर असल्याचे चित्र दिसत असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय मतदारांना पसंत न पडल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे. निष्कर्ष महाड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालामुळे महाड–पोलादपूर पट्ट्यातील आगामी स्थानिक व विधानसभा राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लेखक : कोंकणधारा डेस्क

महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व; जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ताब्यात Read More »

पोलादपूरात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73% मतदान

पोलादपूरात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73% मतदान

पोलादपूर तालुक्यात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73 टक्के मतदान पोलादपूर | प्रतिनिधी – दिनेश चाफळकर:जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यात यंदा ‘दुबार मतदार’ हा कळीचा मुद्दा ठरला आहे. तालुक्यातील २५ ते ३० टक्के मतदार ग्रामीण भागात वास्तव्यास असताना सुमारे ७० टक्के मतदार हे चाकरमानी असल्याने, त्यांना मतदानासाठी गावाकडे आणण्यासाठी उमेदवारांना कोट्यवधी रुपयांचा खर्च सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून आले आहे. विशेष म्हणजे, एवढा खर्च करूनही मतांची खात्री नसल्याने अनेक उमेदवार संभ्रमात असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाहेरून येणाऱ्या मतदारांसाठी ने-आण, जेवण-खाणे, निवास आणि कथित आमिष स्वरूपातील खर्च जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या उमेदवारांना करावा लागत आहे. परिणामी, यंदा रायगड जिल्हा परिषदेच्या दोन गटांतील सहा उमेदवारांपैकी तुल्यबळ लढतीतील चार उमेदवारांना, तसेच पोलादपूर पंचायत समितीच्या चार गणांतील आठ उमेदवारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागल्याचे दिसून आले. 55.73 टक्के मतदान; शेवटच्या तासांत फारशी वाढ नाही सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार पोलादपूर तालुक्यात 55.73 टक्के मतदान झाले. शेवटच्या दोन तासांत मतदानाच्या टक्केवारीत फारशी वाढ झाली नसल्याचे प्रशासनाच्या नोंदींवरून स्पष्ट झाले आहे.दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 11,163 पुरुष आणि 10,705 महिला, असे एकूण 21,868 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटातील उमेदवार अजय सलागरे यांनी कापडे बुद्रुक शाळेत सपत्नीक मतदान केले. निलेश कुंभार यांनी वाकण शाळेत मतदान केले. तर लोहारे गटातील उमेदवार चंद्रकांत कळंबे यांनी उमरठ येथे आणि कृष्णा कदम यांनी ओंबळी येथील प्राथमिक शाळेत मतदान केले. कुठल्या मतदान केंद्रांवर कुणाचे भवितव्य ठरणार? कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गट अंतर्गत माटवण पंचायत समिती गणातील गोवेले, उमरठ, धारवली, कालवली, मोरसडे, बोरघर, आडावळे बुद्रुक, बोरावळे, माटवण, देवळे, वाकण, कापडे बुद्रुक, कापडे खुर्द, चांभारगणी बुद्रुक आणि बोरज येथील मतदार साक्षी कांबळेकर विरुद्ध हर्षदा वरवाटकर, तसेच अजय सलागरे विरुद्ध निलेश कुंभार यांचे भवितव्य ठरवणार आहेत. कापडे बुद्रुक पंचायत समिती गणात देवळे, करंजे, दाभिळ, लहुळसे, केवनाळे, वाकण-१, वाकण-२, नानेघोळ, कापडे खुर्द, कापडे बुद्रुक (१ ते ३), रानकडसरी, रानबाजिरे, चांभारगणी बुद्रुक, निवे, किनेश्वर, साखर येथील मतदारांनी अनिल दळवी विरुद्ध अनिल मालुसरे यांच्यासाठी मतदान केले आहे. लोहारे गटात चौरंगी लढत लोहारे जिल्हा परिषद गटात कृष्णा कदम (कमळ), अ. रझाक करबेलकर (हात), चंद्रकांत कळंबे (शिवसेना) आणि कृष्णा कदम (ढोबळी मिरची) अशी चौरंगी लढत असून, कोतवाल गणातील सुरेंद्र चव्हाण विरुद्ध अविनाश शिंदे यांचेही भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.लोहारे पंचायत समिती गणात युगज्ञा दीपक उतेकर विरुद्ध अनिता अनिल भिलारे यांच्यासाठी विविध गावांतील मतदारांनी मतदान केले. मतदान केंद्रांबाहेर वाहनांची गर्दी तालुक्यातील बहुतांश मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिघाबाहेर लक्झरी बसेस, मोटारकार, जीप आणि खासगी आरामगाड्यांची मोठी गर्दी दिसून आली. सुमारे ७० टक्के मतदार पोलादपूरबाहेरील असल्याने हा खर्च सर्वसामान्य उमेदवारांच्या आवाक्याबाहेर जात असल्याची चर्चा आहे. दुबार मतदार’ प्रश्नावर तोडगा हवा या पार्श्वभूमीवर भविष्यात ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमधील खर्च टाळण्यासाठी पोस्टल मतांचा पर्याय, किंवा आधारकार्डशी मतदार ओळखपत्र जोडून एकाच ठिकाणी मतदानाची व्यवस्था करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.पोलादपूर तालुक्यातील अनेक मतदार मुंबई व ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास असून, काहीजण तिकडील महापालिकांमध्ये नगरसेवकही झाले आहेत. त्यामुळे आधार-मतदार ओळखपत्र लिंकिंग सक्तीचे केल्यास दुबार मतदारांचा प्रश्न स्पष्ट होऊ शकतो, अशी मागणी पुढे येत आहे. निकाल सोमवारी सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, मतमोजणी सोमवारी होणार आहे. पोलादपूर तालुक्यातील ‘दुबार मतदार’ प्रश्नाचा निकालांवर नेमका किती परिणाम होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

पोलादपूरात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73% मतदान Read More »

पनवेल महापालिका: भाजपकडून महापौर–उपमहापौर उमेदवार जाहीर

पनवेल महानगरपालिकेसाठी भाजपकडून महापौर व उपमहापौर पदाचे उमेदवार जाहीर पनवेल | प्रतिनिधी – संकेत गायकवाड:पनवेल महानगरपालिकेच्या आगामी सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष यांनी महत्त्वाचा निर्णय घेत महापौर व उपमहापौर पदासाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपकडून महापौर पदासाठी श्री. नितीनभाई पाटील तर उपमहापौर पदासाठी सौ. प्रमिला रवींद्र पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. या घोषणेमुळे पनवेलच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, महापालिकेच्या नेतृत्वाबाबतचे चित्र मोठ्या प्रमाणात स्पष्ट झाले आहे.सत्तास्थापनेच्या दृष्टीने महत्त्वाची घोषणा पनवेल महानगरपालिकेतील सत्तास्थापनेसाठी भाजपकडून करण्यात आलेली ही घोषणा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. महापौर आणि उपमहापौर हे महापालिकेतील सर्वोच्च पदे असल्याने, या पदांवर कोण नेतृत्व करणार याकडे शहरातील नागरिकांपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत सर्वांचे लक्ष लागले होते. उमेदवार जाहीर होताच आता सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. विकासकेंद्री नेतृत्वावर भाजपचा भर भाजपने नितीनभाई पाटील आणि प्रमिला रवींद्र पाटील यांची निवड करताना शहराच्या विकासासाठी सक्षम, अनुभवी आणि समन्वयात्मक नेतृत्व देण्याचा विचार केल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पनवेल शहर झपाट्याने विकसित होत असून, वाढती लोकसंख्या, पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि नागरी सुविधा हे प्रमुख प्रश्न आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या नेतृत्वाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह उमेदवारांच्या घोषणेनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी अभिनंदनाचे संदेश, सोशल मीडियावर शुभेच्छा आणि कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. आगामी महापालिका कामकाजात भाजपचे नेतृत्व कसे राहील, याबाबत सकारात्मक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. 🔍 पुढील घडामोडींवर लक्ष महापौर व उपमहापौर उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता प्रत्यक्ष निवड प्रक्रिया, पदभार स्वीकारण्याची तारीख आणि महापालिकेतील सत्तावाटप याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच विरोधी पक्षांची भूमिका काय असेल, यावरही पनवेलच्या राजकारणात पुढील समीकरणे ठरणार आहेत. पनवेल महानगरपालिकेसाठी भाजपने महापौर व उपमहापौर पदांचे उमेदवार जाहीर करत सत्तास्थापनेच्या दिशेने ठोस पाऊल टाकले आहे. नितीनभाई पाटील आणि प्रमिला रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहराच्या विकासाला कोणती दिशा मिळते, याकडे आता नागरिकांसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

पनवेल महापालिका: भाजपकडून महापौर–उपमहापौर उमेदवार जाहीर Read More »

महाड ZP–पं.स. निवडणूक: ७ फेब्रुवारीला कडक पोलीस बंदोबस्त

महाड ZP–पं.स. निवडणूक: अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त महाड | प्रतिनिधी – दिनेश चाफळकर:येत्या ७ फेब्रुवारी २०२६ रोजी महाड तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच मतदान प्रक्रिया निर्भय, शांततामय आणि पारदर्शक पार पडावी, यासाठी कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी एकूण ४५८ होमगार्ड, ३२३ पोलीस अंमलदार, १७ अधिकारी आणि दोन स्पेशल फोर्स निवडणूक काळात कार्यरत राहणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक; संवेदनशीलतेची पार्श्वभूमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिसऱ्या टप्प्यात ७ फेब्रुवारी रोजी महाड तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ५ गट आणि पंचायत समितीसाठी १० गण यांची निवडणूक होत आहे. काही दिवसांपूर्वीच महाड नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्या मतदानाच्या दिवशी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात झालेल्या राडा-प्रकरणामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती ग्रामीण भागात होऊ नये, यासाठी यावेळी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. संचलन व प्रतिबंधात्मक उपाय निवडणूकपूर्व तयारीचा भाग म्हणून दासगाव, खर्डी आणि बिरवाडी बाजारपेठ या तीन संवेदनशील ठिकाणी पोलिसांमार्फत दोन दिवसांपूर्वी संचलन (रूट मार्च) करण्यात आले. या संचलनाद्वारे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे, समाजकंटकांवर वचक ठेवणे आणि संभाव्य अनुचित प्रकारांना आळा घालणे, हा उद्देश असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. २०३ मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त महाड तालुक्यात एकूण २०३ मतदान केंद्रे आहेत. या अंतर्गत महाड शहर, महाड तालुका आणि एमआयडीसी अशी तीन पोलीस ठाणे कार्यरत आहेत. निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून हा बंदोबस्त ६ आणि ७ फेब्रुवारी या दोन दिवसांसाठी राहणार आहे. पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्ताची आकडेवारी निवडणूक बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाने पुढीलप्रमाणे मनुष्यबळ तैनात केले आहे— एमआयडीसी पोलीस ठाणे:१०५ होमगार्ड, ६५ पोलीस अंमलदार महाड शहर पोलीस ठाणे:२१२ होमगार्ड, १८८ पोलीस अंमलदार आणि १२ अधिकारी महाड तालुका पोलीस ठाणे:१४१ होमगार्ड, ७० पोलीस अंमलदार आणि ५ अधिकारी या तिन्ही पोलीस ठाण्यांच्या अखत्यारीत एकूण ४५८ होमगार्ड, ३२३ पोलीस अंमलदार आणि १७ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, एक प्लाटून (१ अधिकारी व २३ पोलीस अंमलदार) तसेच एक सेक्शनमध्ये ८ पोलीस अंमलदार स्वतंत्रपणे तैनात राहणार आहेत. गावपातळीवरही सतर्कता महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राडा-प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, यावेळी गावपातळीवरील पोलीस पाटील यांनाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. संशयास्पद हालचाली, जमाव जमवणे, दारू-प्रलोभन किंवा अफवा पसरवण्याचे प्रकार आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कायदा-सुव्यवस्था राखण्यावर भर पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, निवडणूक काळात आचारसंहितेचे उल्लंघन, जमावबंदी आदेशांचे उल्लंघन, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न किंवा मतदान प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाईल. शांततामय निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. महाड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शांततेत आणि सुरळीत पार पडाव्यात, यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ, स्पेशल फोर्स, संचलन आणि गावपातळीवरील सतर्कतेच्या उपाययोजनांमुळे कोणताही अनुचित प्रकार टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न स्पष्ट दिसून येतो. आता ७ फेब्रुवारी रोजी मतदारांचा प्रतिसाद आणि निवडणूक प्रक्रियेतील शिस्त याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

महाड ZP–पं.स. निवडणूक: ७ फेब्रुवारीला कडक पोलीस बंदोबस्त Read More »

ZP निवडणूक: रामदास कदमांची सुनील तटकरे व भास्कर जाधवांवर टीका

जिल्हा परिषद निवडणूक: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कोकणात आरोप–प्रत्यारोप कोकण | कोंकणधारा डेस्क:जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असताना विविध पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप–प्रत्यारोप करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर तीव्र टीका केली आहे. रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना आरोप केला की, अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी “गलिच्छ राजकारण” केले. शरद पवार यांना शह देण्यासाठी वहिनींना तातडीने शपथ घ्यायला लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “अजित पवार यांच्या चितेची आग विझण्याआधीच शपथविधी करण्यात आला. दहा दिवस थांबले असते तर काय झाले असते?” असा सवालही कदम यांनी उपस्थित केला. तटकरेंवर गंभीर आरोप रामदास कदम यांनी पुढे असा दावा केला की, शरद पवार ताबा घेतील या भीतीपोटी हा निर्णय घेण्यात आला. तटकरेंची ही कृती निंदनीय असून महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही, असे त्यांनी म्हटले. “सुनील तटकरे हे विश्वासघातकी असून, ज्यांनी त्यांना मोठे केले त्यांनाच संपवण्याचे काम त्यांनी केले,” असा आरोपही कदम यांनी केला. लोकसभेच्या संदर्भात बोलताना कदम म्हणाले की, “मी त्यांना लोकसभेत निवडून आणले; मात्र योगेश कदम यांना पाडण्यासाठी त्यांनीच प्रयत्न केले,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला. या सर्व आरोपांवर सुनील तटकरे यांच्याकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. भास्कर जाधवांवरही प्रत्युत्तर दरम्यान, याच दिवशी भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला उत्तर देताना कदम यांनी जाधव यांच्यावरही तीव्र शब्दांत टीका केली. भास्कर जाधव यांचा “तोल गेला असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे,” असा आरोप करत त्यांनी गुहागर मतदारसंघात पराभव दिसत असल्यानेच ते अशी वक्तव्ये करत असल्याचे म्हटले. कदम यांनी जाधव यांच्याशी संबंधित काही जुने राजकीय संदर्भ देत, “१९९५ मध्ये त्यांना आमदारकीची संधी मीच दिली आणि शिवसेनेत आणले,” असा दावा केला. या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राजकीय वातावरण तापले जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने अशा आरोप–प्रत्यारोपांमुळे कोकणातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. विविध पक्षांकडून जोरदार प्रचार, सभांमधील भाषणं आणि माध्यमांतील आरोप यामुळे मतदारांमध्येही चर्चा रंगताना दिसत आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय नेत्यांमधील आरोप–प्रत्यारोप हे निवडणूक वातावरणाचा भाग बनले असले, तरी मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो, हे मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, रामदास कदम यांच्या वक्तव्यांमुळे कोकणातील राजकारणात नवी खळबळ उडाली असून, संबंधित नेत्यांच्या प्रतिक्रियांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

ZP निवडणूक: रामदास कदमांची सुनील तटकरे व भास्कर जाधवांवर टीका Read More »

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोध नाही; ठाकरे गटाचा उमेदवार देण्याचा विचार

मुंबई | कोंकणधारा डेस्क:राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) महापौर निवडणुकीबाबत महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या महापौरपदी ११ फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला जाणार असून, ७ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आल्याने ही निवडणूक आता चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाची रणनीती चर्चेत सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि काही अनुभवी नगरसेवकांमध्ये यासंदर्भात चर्चा झाली आहे. त्यामुळे महापौरपदासाठी ठाकरे गट थेट मैदानात उतरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील सहकार्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक अधिकच लक्षवेधी बनली आहे. आदित्य ठाकरेंनी सस्पेन्स कायम ठेवला या सगळ्या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट भूमिका मांडण्याऐवजी सस्पेन्स कायम ठेवला आहे. “आमची तयारी सुरू आहे. आम्ही उमेदवार देणार की नाही, हे तुम्हाला लवकरच समजेल. याबाबत आत्ता काही बोलणार नाही,” असे म्हणत त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “बीएमसीची निवडणूक होऊन गेली आहे. आता शहराशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. राजकीय विषय बाजूला ठेवा; आमच्या पक्षाची माणसं कामाला लागली आहेत.” त्यांच्या या वक्तव्यामुळे महापौर निवडणुकीचा तिढा आणखी वाढल्याचे मानले जात आहे. आरक्षण सोडतीनंतर समीकरण बदलले मुंबई महापालिकेच्या निकालानंतर महापौरपद कोणत्या पक्षाकडे जाणार, यावरून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी “देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल,” असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.दरम्यान, महापौरपदाचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर भाजपचा महापौर होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र, ठाकरे गट उमेदवार देणार असल्यास ही निवडणूक थेट लढतीत जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ट्रॅफिकवरही भाष्य दरम्यान, मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरही आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. “पत्रव्यवहार करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश द्यायला हवेत. एमएसआरडीसी कोणाकडे आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांचे ऐकत नसतील,” असा टोला त्यांनी लगावला. “३२ तास लोक वाहतूक कोंडीत अडकले होते. फोटो काढायला पुढे असणारे मंत्री त्या दिवशी कुठे होते?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी टोल ऑपरेटरांनी रिफंड आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही केली. चौकशी आणि क्लीन चिट देण्याची प्रथा मागील चार वर्षांपासून सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. आदित्य ठाकरे म्हणाले की, किमान प्रवाशांपर्यंत मदत पोहोचवणे, पर्यायी लेन सुरू करणे किंवा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होते. “हेलिकॉप्टरचा वापर मंत्री प्रचारासाठी करतात; त्याच माध्यमातून अडकलेल्या प्रवाशांना मदत करता आली असती,” असेही त्यांनी नमूद केले. मुंबई महापालिकेच्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या हालचालींमुळे राजकीय सस्पेन्स वाढला आहे. बिनविरोध निवडणूक होणार की थेट लढत पाहायला मिळणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. दरम्यान, शहराच्या प्रशासकीय आणि वाहतूक प्रश्नांवरून सुरू असलेल्या राजकीय आरोप–प्रत्यारोपांमुळे मुंबईचे राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोध नाही; ठाकरे गटाचा उमेदवार देण्याचा विचार Read More »

ZP निवडणूक: भास्कर जाधवांची रामदास कदमांवर तीव्र टीका

रत्नागिरी | कोंकणधारा डेस्क:जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने विविध पक्षांचे नेते कमी वेळेत अनेक ठिकाणी हजेरी लावत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान आरोप–प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र झाल्याचे दिसून आले. याच पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी माजी मंत्री व रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. खेड येथील प्रचार सभेत बोलताना भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्यांवर आणि भूमिकेवर टीकात्मक टिप्पणी केली. भास्कर जाधवांचे आरोप भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणात रामदास कदम यांच्यावर वैयक्तिक पातळीवरील आरोप करताना म्हटले की, “रामदास कदम कुठेही गेले तरी दुसऱ्यांच्या नावाने टीका करतात.” त्यांनी कदम यांच्या वागणुकीवर आणि राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. तसेच, “रामदास कदम यांना स्वतःच्या कृतींचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,” असेही त्यांनी सांगितले. यावेळी जाधव यांनी आपल्या कुटुंबाविषयी बोलताना, “माझा मुलगा मेहनतीने पुढे गेला आहे,” असे सांगत अप्रत्यक्षपणे कदम यांच्या टीकेला उत्तर दिले. या भाषणात त्यांनी काही जुने राजकीय संदर्भ मांडत रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. विकासकामांवरूनही टीका भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्या कार्यकाळातील काही विकासकामांचा उल्लेख करत त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खाडी पुलावरील कर्जी पुलाचा संदर्भ देत त्यांनी, “टेंडर निघालेल्या पुलाच्या अंदाजपत्रकाबाबत चुकीच्या सूचना देण्यात आल्या,” असा आरोप केला. या माध्यमातून त्यांनी कदम यांच्या प्रशासकीय निर्णयक्षमतेवर टीका केली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वातावरण तापले आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार प्रचार सभा झाल्या. या सभांमध्ये अनेक नेत्यांनी एकमेकांवर आरोप–प्रत्यारोप केले. भास्कर जाधव यांच्या टीकेनंतर रामदास कदम यांनीही प्रत्युत्तर दिल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापल्याचे दिसून आले. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारण अधिक आक्रमक झाले आहे. नेत्यांमधील आरोप–प्रत्यारोपांमुळे निवडणूक प्रचाराला धार आली असली, तरी अंतिम निर्णय मतदारांच्या हाती आहे. मतदानानंतरच या राजकीय संघर्षाचा निकाल स्पष्ट होणार असून, तोपर्यंत अशा वक्तव्यांमुळे जिल्ह्यातील राजकीय चर्चा रंगत राहण्याची शक्यता आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

ZP निवडणूक: भास्कर जाधवांची रामदास कदमांवर तीव्र टीका Read More »

गोरेगावात शिंदे गटाची शक्तीप्रदर्शन सभा; विजयाचा संकल्प

माणगाव | प्रतिनिधी – जहेंद्र हरिभाऊ मुंढे:रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती माणगावच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोरेगाव येथे सोमवारी (दि. २ फेब्रुवारी २०२६) शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांची भव्य जाहीर सभा प्रचंड उत्साहात आणि मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडली. गोरेगाव जिल्हा परिषद गट क्रमांक ४८ तसेच पंचायत समिती गणांतील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित या सभेने संपूर्ण गोरेगाव परिसर शिवसेनामय केला असून, माणगाव तालुक्यातील राजकीय वातावरण तापल्याचे स्पष्टपणे दिसून आले. राजमाता जिजाऊ मैदानावर शक्तीप्रदर्शन गोरेगाव येथील राजमाता जिजाऊ मैदानावर पार पडलेल्या या जाहीर सभेला महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री (रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी) भरतशेठ गोगावले आणि युवासेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे सभेला विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. भगवे झेंडे, जोरदार घोषणा आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. उमेदवारांच्या प्रचाराला बळ या जाहीर सभेत गोरेगाव जिल्हा परिषद गट क्रमांक ४८ मधून उमेदवार श्री. दिनेश जनार्दन हरवंडकर, गोरेगाव पंचायत समिती गण क्रमांक ९५ मधून सौ. स्वाती अरुण करकरे आणि लोणेरे पंचायत समिती गण क्रमांक ९६ मधून श्री. रवींद्र महादेव टेंबे यांच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात करण्यात आली. तिन्ही उमेदवारांनी आपल्या भाषणातून मतदारसंघातील स्थानिक प्रश्न, विकासाची दिशा आणि पुढील पाच वर्षांचा आराखडा मांडत जनतेशी थेट संवाद साधला. भरतशेठ गोगावले यांचा विकासावर भर या सभेत बोलताना कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी शिवसेनेच्या लोकाभिमुख धोरणांवर भर दिला. “शिवसेना ही केवळ राजकीय पक्ष नसून, सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारी लोकचळवळ आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था आणि रोजगार निर्मिती या माध्यमातून ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे हेच आमचे अंतिम उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी आतापर्यंत करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेत त्यांनी आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती माध्यमातून अधिक व्यापक आणि वेगवान विकास साधण्याचा निर्धार व्यक्त केला. युवकांच्या भूमिकेवर प्रकाश युवासेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी आपल्या भाषणात युवकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. “आजचा युवक जागरूक असून बदलासाठी तयार आहे. नव्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना भविष्यातील आव्हानांना समर्थपणे सामोरी जाणार आहे,” असे ते म्हणाले. युवकांच्या शक्तीवर विश्वास ठेवून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सभेदरम्यान शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला. घोषणाबाजी, टाळ्यांचा कडकडाट आणि भगव्या झेंड्यांच्या साक्षीने संपूर्ण गोरेगाव परिसर शिवसेनेच्या जल्लोषात न्हाऊन निघाला. स्थानिक नागरिकांची मोठी उपस्थिती पाहता, या सभेने माणगाव तालुक्यातील निवडणूक प्रचाराला नवी ऊर्जा मिळाल्याचे स्पष्ट झाले. राजकीय अर्थ आणि पुढील दिशा एकूणच, गोरेगावातील ही भव्य जाहीर सभा माणगाव तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) च्या प्रचाराला नवी दिशा देणारी ठरली आहे. उमेदवारांची मांडणी, वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेची ताकद आणि संघटनबळ ठळकपणे समोर आले आहे. येत्या काही दिवसांत प्रचार अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून, गोरेगाव आणि परिसरातील मतदारांचा कौल कोणत्या दिशेने झुकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

गोरेगावात शिंदे गटाची शक्तीप्रदर्शन सभा; विजयाचा संकल्प Read More »