konkandhara.com

12 अप्रैल 2026

पवन तलाव मैदानाला आंतरराष्ट्रीय दर्जा; डे-नाईट स्पर्धांसाठी सुविधा उभारणार – शेखर निकम

पवन तलाव मैदानाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचा संकल्प; डे-नाईट स्पर्धांसाठी विशेष सुविधा उभारणार

आमदार शेखर निकम यांची ग्वाही; राज्यस्तरीय आमदार चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन चिपळूण : शहरातील ऐतिहासिक पवन तलाव मैदान हे खऱ्या अर्थाने चिपळूण शहराचा दागिना असून या मैदानाचा सर्वांगीण विकास करून ते अधिक सुसज्ज करण्यावर आगामी तीन वर्षांत विशेष भर दिला जाणार आहे. तसेच येथे डे-नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित करता याव्यात यासाठी आधुनिक प्रकाशयोजना उभारण्याबाबत तांत्रिक बाबींचा अभ्यास केला जाणार असून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान उभे करण्याचा मानस असल्याची माहिती आमदार शेखर निकम यांनी दिली. चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने शहरातील पवन तलाव मैदानावर आयोजित ‘आमदार चषक’ भव्य सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे लेदर बॉल क्रिकेटला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सलग तीन वर्षे राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. प्रशिक्षक उदय काणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट खेळाडू घडत असून स्पर्धांमधूनही खेळाडूंना व्यासपीठ मिळत आहे. आज चिपळूणमधील खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवत आहेत. पुढील वर्षी डे-नाईट सीजन बॉल स्पर्धा घेण्यासाठी मैदानावर वीज सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे केली. यावेळी रणजीपटू सुनील मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, चिपळूणमध्ये उत्कृष्ट पद्धतीने मैदान तयार झाले असून आमदार शेखर निकम चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनला सिझन बॉल क्रिकेटसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या सुविधांचा खेळाडूंनी फायदा घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमाला क्रिकेटमधील नामवंत प्रशिक्षक सचिन कोळी, चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर, राष्ट्रवादीचे नेते जयंद्रथशेठ खताते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, सभापती सूर्यकांत घेतले, शिवसेनेच्या महिला शहरप्रमुख प्राजक्ता टकले, नगरसेवक संजय गोताड, डॉ. अभिजीत सावंत, रियाज खेरटकर, दिनू माटे, सचिन भोसले, सम्राट भोसले आदींसह असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिरुद्ध निकम, सचिव राजेश सुतार, समालोचक सचिन कुलकर्णी, सुनील रेडीज, योगेश बांडागळे, सुयोग चव्हाण, विनीत देवधर, संदेश गोरिवले, पंच गोट्या भोसले, उदय काणेकर, दादा लकडे, साहिल कदम, प्रसाद सागवेकर, सलीम पालोजी, बाबल्या जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिद खेरटकर यांनी केले. दरम्यान, ‘आमदार चषक’ राज्यस्तरीय सीजन बॉल क्रिकेट स्पर्धेचा समारोप १९ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी दिली.

पवन तलाव मैदानाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचा संकल्प; डे-नाईट स्पर्धांसाठी विशेष सुविधा उभारणार Read More »

जगबुडी पुलावर कंटेनरचा भीषण अपघात; 200 फूट खोल नदीत पडण्यापासून बचाव

जगबुडी पुलावर कंटेनरचा भीषण अपघात; मोठी दुर्घटना टळली

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर रविवारी (दि. १२ एप्रिल २०२६) सकाळी सुमारे ७ वाजता भीषण अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मालवाहू कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरने दुभाजक तोडत थेट दोन पुलांच्या मधोमध जाऊन अडकला. अपघातावेळी कंटेनरचा अर्धा भाग हवेत लटकत नदीच्या दिशेने झुकलेला होता. त्यामुळे तो सुमारे २०० फूट खोल जगबुडी नदीत कोसळण्याची भीती निर्माण झाली होती. काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मोठ्या प्रयत्नानंतर दोन क्रेनच्या सहाय्याने अडकलेला कंटेनर सुरक्षित बाहेर काढण्यात आला. या अपघातात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान, कंटेनर बाहेर काढण्याचे काम सुरू असताना मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी एक लेन सुमारे दीड तास बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. विशेष म्हणजे, जगबुडी पुलावर याच आठवड्यातील हा दुसरा भीषण अपघात असून वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या पुलावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांकडून येथे तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

जगबुडी पुलावर कंटेनरचा भीषण अपघात; मोठी दुर्घटना टळली Read More »

रत्नागिरीत भाजप कार्यकर्ता संमेलन उत्साहात; SIR मार्गदर्शनावर भर

रत्नागिरीत भाजप कार्यकर्ता संमेलन उत्साहात संपन्न

रत्नागिरी: रत्नागिरी तालुका दक्षिण येथे भारतीय जनता पार्टीतर्फे SIR मार्गदर्शन व सक्रिय कार्यकर्ता संमेलन जिल्हा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुका अध्यक्ष दादा दळी यांनी भूषवले. निवडणूक आयोगाकडून सध्या सुरू असलेल्या मतदार यादी पुनर्लोकनाच्या पार्श्वभूमीवर, भाजपच्या BLO 2 कार्यकर्त्यांनी आपल्या बूथवर कोणत्या पद्धतीने प्रभावी काम करावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन दादा दळी यांनी केले. तसेच 6 एप्रिल रोजी साजऱ्या झालेल्या भाजप स्थापना दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा आढावा घेत, संघटन विस्तार आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना दिशा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष राजेश पाथरे यांनी केले, तर प्रास्ताविक अवधूत कळंबटे यांनी मांडले. यावेळी माजी महिला आघाडी अध्यक्षा ऐश्वर्या जठार यांनीही मार्गदर्शन केले. या संमेलनाला सुशांत पाटकर, महेश खानविलकर, अनघा साळवी, भाई जठार, चिराग खटकुळ, संतोष बोरकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रत्नागिरीत भाजप कार्यकर्ता संमेलन उत्साहात संपन्न Read More »