प्रतिनिधी : कोकणधारा
मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जैनमुनींच्या आशीर्वादामुळे घशाचा त्रास दूर झाल्याचा दावा केल्यानंतर राज्यात वादंग निर्माण झाला आहे. अंधश्रद्धेविरोधातील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानावरून सोशल मीडियावर टीकेची लाट उसळली असून, त्यांनीही ट्रोलर्सना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मंगळवारी महावीर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना तावडे यांनी सांगितले की, गेल्या दीड ते दोन वर्षांपासून त्यांना घशाचा त्रास होता. औषधोपचार करूनही फरक पडत नव्हता. मात्र जैनमुनी नम्रमुनी महाराज यांच्या आशीर्वादानंतर आपला आवाज सुधारला असून, हा “चमत्कार” असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे विधान केल्याचा आरोप होत आहे.
या वक्तव्यानंतर विविध स्तरांतून टीका झाली. संजय राऊत यांच्यासह अनेकांनी तावडे यांच्यावर निशाणा साधला. यानंतर बुधवारी पत्रकार परिषद घेत तावडे यांनी टीकाकारांना उत्तर दिले.
“ट्रोल करणाऱ्यांच्या जिभेला काही हाड आहे की नाही? तुमच्या घरात आया-बहिणी आहेत की नाहीत?” असा सवाल करत त्यांनी टीकाकारांवर संताप व्यक्त केला. बोरीवली येथे आयोजित कार्यक्रमात आपण केवळ आदरभाव व्यक्त केला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
तावडे पुढे म्हणाल्या की, नम्रमुनी महाराजांनी त्यांना ‘ओम’चा उच्चार करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी त्याचा नियमित सराव केल्यानंतर आवाजात सुधारणा झाली. “यात कुठेही अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिलेले नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
तसेच आपण स्वामी समर्थ आणि साईबाबा यांचे भक्त असल्याचे सांगत, नम्रमुनी महाराजांप्रतीही श्रद्धा असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे अंधश्रद्धा विरुद्ध श्रद्धा या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वाद पेटला आहे.















