प्रतिनिधी : कोकणधारा
रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवारी रात्री भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, १२ मार्च २०२६ रोजी रात्री ८ वाजून १९ मिनिटांनी हा भूकंप नोंदविण्यात आला.
रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता २.८ इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश १६.९२ उत्तर व रेखांश ७३.४४ पूर्व या दरम्यान रत्नागिरी परिसरात जमिनीखाली सुमारे १० किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र काही भागांतील नागरिकांना जमिनीला सौम्य कंप जाणवल्याने काही काळ नागरिक घराबाहेर पडले होते.
दरम्यान, प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.















