प्रतिनिधी : कोकणधारा
रत्नागिरी, दि. १६ (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार दीपस्तंभाप्रमाणे समाजात मार्गदर्शक ठरावेत आणि ते जनसामान्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच या स्मारकातून भगवान गौतम बुद्धांचे विचार समाजापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतात याचा अभ्यासही होणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
पाली येथे जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत ३ टक्के वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व दीक्षाभूमी इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करून करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप, उपसभापती गजानन धनावडे, पंचायत समिती सदस्य पद्मजा कांबळे, समाज कल्याण सहाय्यक दीपक घाटे, पाली पंचक्रोशी बौद्ध समाज मंडळाचे अध्यक्ष व सरपंच विठ्ठल सावंत, सल्लागार एम. बी. कांबळे, जि.प. सदस्य ॲड. सुयोग कांबळे, माजी जि.प. सदस्य रामभाऊ गराटे, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, भंते कश्यपजी थेरो, संतोष सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले की, तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले होते. तब्बल २३ वर्षांनंतर या स्मारकाच्या इमारतीचे उद्घाटन होत आहे. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या संविधानकर्त्याचे हे स्मारक सर्व समाजासाठी असून ते कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नसावे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात संविधान बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरविण्यात आल्या होत्या; मात्र त्या केवळ अफवाच ठरल्या. बापजन्मात संविधान कुणीही बदलू शकत नाही. अशी वेळ आलीच तर त्याच्या विरोधात समाजाचे नेतृत्व करण्यास आपण तयार आहोत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
बाबासाहेबांच्या स्मारकासाठी एखादा कार्यकर्ता काम करत असेल तर समाजाने त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. ‘विकास हीच माझी जात आणि विकास हाच माझा धर्म’ या भावनेतून आपण काम करत असल्याचे सांगून त्यांनी भविष्यकाळात सर्वांनी एकसंघपणे सामाजिक कार्य करण्याचे आवाहन केले.
आखाती देशांतील लोकही ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ असा संदेश देत आहेत. या स्मारकातून बाबासाहेबांचे विचार दीपस्तंभाप्रमाणे समाजाला दिशा देणारे ठरावेत आणि ते जनमानसात रुजावेत, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पाली पंचक्रोशी बौद्ध समाज मंडळाचे सल्लागार एम. बी. कांबळे यांनी स्मारकाच्या उभारणीविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.















