मुंबई–पुणे एक्स्प्रेसवे 32 तास ठप्प; चौकशीचे आदेश, राजकीय प्रतिक्रिया तीव्र
मुंबई | कोंकणधारा डेस्क:
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर टँकर पलटी झाल्याने निर्माण झालेल्या भीषण वाहतूककोंडीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. या घटनेमुळे तब्बल 32 तास हा महत्त्वाचा महामार्ग ठप्प झाला होता. हजारो प्रवासी, खासगी वाहने, अवजड ट्रक आणि बस या कोंडीत अडकल्या होत्या. अनेक प्रवाशांना पाणी, अन्न आणि वैद्यकीय मदतीअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. टँकर हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्याचे जाहीर करण्यात आले असले, तरी 24 तास उलटूनही बोरघाट परिसरात पुन्हा वाहने बंद पडल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
नेमकं काय घडलं?
3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर गॅसचा टँकर पलटी झाला. संभाव्य धोका लक्षात घेऊन सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ वाहतूक थांबवण्यात आली. मात्र टँकर हटविण्याची प्रक्रिया, पर्यायी मार्गांची व्यवस्था आणि आपत्कालीन यंत्रणांचा समन्वय अपेक्षित गतीने न झाल्याने वाहतूककोंडी तासन्तास वाढत गेली. परिणामी तब्बल 32 तास प्रवासी अडकून पडले आणि महामार्गावरील हालअपेष्टांचे दृश्य सर्वत्र चर्चेचा विषय ठरले.
🛣️ बोरघाटात पुन्हा वाहतूक ठप्प
टँकर हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात बोरघाट परिसरात अनेक अवजड वाहने बंद पडल्याने पुन्हा एकदा संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. जोपर्यंत ही वाहने हटविली जाणार नाहीत, तोपर्यंत वाहतूक पूर्णपणे सुरळीत होणे कठीण असल्याचे प्रत्यक्षदर्शी आणि वाहतूक पोलिसांनी सांगितले. यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप आणि प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्र्यांची दखल; चौकशीचे आदेश
या गंभीर घटनेची दखल देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि घडल्यास तत्काळ व परिणामकारक उपाययोजना कशा करता येतील, याबाबत चौकशी करून शिफारसींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी एमएसआरडीसी ला दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत महामार्गावर वाहतूक व्यवस्थापन, अवजड वाहनांची हालचाल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस आराखडा असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
या वाहतूककोंडीची गंभीर दखल एकनाथ शिंदे यांनीही घेतली आहे. त्यांनी आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देत, दीर्घकालीन उपाययोजनांवर भर दिला आहे. या मार्गावर वारंवार होणाऱ्या कोंड्या आणि अपघात लक्षात घेता, पायाभूत सुविधांची सुधारणा तातडीने आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले.
राज ठाकरेंचा सरकारला सवाल
या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांनी सरकार आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग जवळपास 32 तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि नेहमीप्रमाणे सरकारकडून फक्त चौकशीचे आदेश दिले गेले,” असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, “अशा अनेक घटनांच्या चौकशा होतात; पण त्यातून प्रशासन काही बोध घेतो का, हा खरा प्रश्न आहे.”
टँकर पलटीनंतर सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक थांबवणे योग्य होते, हे मान्य करताना त्यांनी प्रशासनाकडे किमान वेळेत रस्ता मोकळा करण्याचा कृती आराखडा तयार होता का, असा थेट सवालही उपस्थित केला.
प्रवाशांचे हाल आणि जनतेचा रोष
वाहतूक ठप्प राहिल्याने प्रवाशांना उघड्यावर रात्र काढावी लागली. काही ठिकाणी अन्न-पाण्याची टंचाई, वृद्ध व लहान मुलांचे हाल आणि रुग्णवाहिकांना मार्ग न मिळण्याच्या घटनाही समोर आल्या. सोशल मीडियावरून अनेकांनी प्रशासनाच्या तयारीअभावी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ही घटना केवळ एक अपघात नसून आपत्कालीन व्यवस्थापनातील उणिवा उघड करणारी ठरली आहे. चौकशी अहवाल आणि राजकीय आश्वासनांपलीकडे जाऊन ठोस कृती आराखडा, तांत्रिक सज्जता आणि समन्वयाची गरज अधोरेखित झाली आहे. भविष्यात अशा घटनांमुळे प्रवाशांना पुन्हा हाल सहन करावे लागू नयेत, यासाठी प्रशासन काय पावले उचलते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क















