प्रतिनिधी : कोकणधारा
चिपळूण : वाशिष्ठी नदीच्या पाण्याबाबत विविध चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर चिपळूण नगर पालिकेकडून नागरिकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीच पुरवले जात असून नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे आवाहन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केले आहे.
नगराध्यक्ष सकपाळ यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वाशिष्ठी नदीचे पाणी प्रदूषित असल्याबाबत कोणताही अधिकृत अहवाल नगर पालिकेकडे प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अशा चर्चांमुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.
चिपळूण नगर पालिका जॅकवेलच्या माध्यमातून नदीतून पाणी उचलते. त्यानंतर त्या पाण्यावर अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रक्रियेद्वारे आवश्यक सर्व टप्प्यांमध्ये प्रक्रिया केली जाते. फिल्ट्रेशन, क्लोरीनेशनसह विविध तांत्रिक प्रक्रियेनंतरच हे पाणी नागरिकांना पुरवले जाते. त्यामुळे नागरिकांना मिळणारे पाणी पूर्णपणे सुरक्षित आणि पिण्यायोग्य असल्याचे नगराध्यक्षांनी नमूद केले.
तसेच, “मी स्वतः जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. पाण्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. नागरिकांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जात आहे,” असेही सकपाळ यांनी सांगितले.
शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा नियमितपणे तपासली जात असून, पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सातत्याने केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अपप्रचारावर विश्वास न ठेवता निर्धास्त राहावे, असे आवाहनही नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केले आहे.















