konkandhara.com

Editorial

'मोसाद' पॅटर्न, बदललेली पाण्याची बाटली आणि वैमानिकाचा ट्रॅक रेकॉर्ड; अजित पवारांच्या निधनाबाबत रोहित पवारांचे खळबळजनक दावे

‘मोसाद’ पॅटर्न, बदललेली पाण्याची बाटली आणि वैमानिकाचा ट्रॅक रेकॉर्ड; अजित पवारांच्या निधनाबाबत रोहित पवारांचे खळबळजनक दावे

Written By : विवेक ताम्हणकर बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न असतानाच, आमदार रोहित पवार यांनी या घटनेमागे मोठ्या घातपाताची शक्यता वर्तवून खळबळ उडवून दिली आहे. हा केवळ अपघात नसून एक पूर्वनियोजित कट असू शकतो, असा संशय त्यांनी एका सादरीकरणाद्वारे (प्रेझेंटेशन) उपस्थित केला. “माझा काका आणि राज्याचा मोठा नेता गेला आहे, आम्हाला उत्तरे मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या निधनापूर्वीच्या काही दिवसांतील त्यांच्या बदललेल्या वागणुकीवर प्रकाश टाकला. त्यांच्या दाव्यानुसार, अजित पवारांना स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल काहीतरी शंका येत असावी, असे त्यांच्या कृतीतून दिसत होते. दादांनी अलीकडच्या काळात आपली पिण्याच्या पाण्याची बाटली बदलली होती. इतकेच नव्हे तर, त्यांनी एका जवळच्या मित्राला स्वतःचे विमान खरेदी करण्याचा सल्ला दिला होता आणि मि त्याना माझ्या मित्राने हेलीकॉप्टर घेतल्याचे सांगितले, “जर मित्र विश्वासू असेल, तर त्याच्याच हेलिकॉप्टरमधून फिरत जा,” असा सल्लाही त्यांनी आपल्याला दिला होता. यावरून त्यांना भविष्यात काहीतरी दगाफटका होऊ शकतो याची चाहूल लागली होती का, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला. यावेळी रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत अलीकडच्या काळात अजित पवार वापरत असलेली पाण्याची अत्यंत सुरक्षित बाटलीही दाखविली.  रोहित पवार यांनी या अपघाताचा संबंध इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’च्या कार्यपद्धतीशी जोडला. मोसादच्या पुस्तकाचा संदर्भ देत ते म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला संपवण्यासाठी त्याच्या चालक किंवा वैमानिकाला आपल्या बाजूने वळवणे किंवा त्याला लक्ष्य करणे हा सर्वात सोपा मार्ग असतो. या प्रकरणातील मुख्य वैमानिक सुमित कपूर याच्या ट्रॅक रेकॉर्डवर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कपूर हा मद्यपान केल्याप्रकरणी तीन वर्षे निलंबित होता. अशा वादग्रस्त पार्श्वभूमीच्या वैमानिकावर कोणाचा दबाव होता का आणि त्याने मुद्दाम अवघड रनवेची निवड का केली, याकडे रोहित यांनी लक्ष वेधले. याशिवाय, तांत्रिक बाबींवर बोट ठेवताना रोहित पवार यांनी अनेक विसंगती मांडल्या. विमान उड्डाणाची वेळ, पायलट आणि नियोजित दौरा ऐनवेळी का बदलला? एटीसी (ATC) ट्रान्सस्क्रिप्ट आणि केंद्रीय विमान मंत्रालयाच्या अहवालातील वेळेत फरक का आहे? खराब दृश्यमानता असूनही लँडिंगचा धोका का पत्करला आणि विमानाचा ट्रान्सपॉन्डर (Transponder) नेमका कोणाच्या सूचनेवरून बंद होता की केला होता? मृत्यू समोर दिसत असतानाही मुख्य वैमानिक गप्प का होता, हे प्रश्न उपस्थित करून त्यांनी या घटनेच्या मुळाशी जाण्याची मागणी केली आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने तपासाच्या विश्वासार्हतेवरही त्यांनी शंका व्यक्त केली असून, हा विमान क्रॅश करण्याचाच कट होता का, असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.

‘मोसाद’ पॅटर्न, बदललेली पाण्याची बाटली आणि वैमानिकाचा ट्रॅक रेकॉर्ड; अजित पवारांच्या निधनाबाबत रोहित पवारांचे खळबळजनक दावे Read More »

राज्य मंत्रिमंडळ बैठक: 19 निर्णय; क्रीडा, सिंचन, आरोग्याला गती

राज्य मंत्रिमंडळ बैठक: 19 निर्णय; क्रीडा, सिंचन, आरोग्याला गती

मंत्रिमंडळ बैठक: 19 महत्त्वाचे निर्णय; विकासकामांना वेग मुंबई | कोंकणधारा डेस्क:राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या बैठकीत एकूण 19 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या सुरुवातीला भावनिक वातावरण होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती जाणवली, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रथमच मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली. या बैठकीत काही निर्णय हे अजित पवार यांच्या कार्यकाळात प्रस्तावित असलेल्या प्रकल्पांशी संबंधित असल्याने त्यांना प्राधान्याने मंजुरी देण्यात आली. त्यात बारामती जिल्हा क्रीडा संकुलासाठी 75 कोटी 13 लाख रुपये मंजूर करण्यात आले. 🗂️ मंत्रिमंडळ बैठकीतील 19 महत्त्वाचे निर्णय (ठळक मुद्दे) सिंचन प्रकल्पांना गती:नाबार्ड कडून 15,000 कोटींचे दीर्घ मुदतीचे कर्ज. 57 अपूर्ण सिंचन प्रकल्प व 193 प्रकल्पांच्या वितरण प्रणालीत सुधारणा; 8 लाख हेक्टर क्षेत्राला सिंचन. (जलसंपदा) कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम:करवीर तालुक्यात 12 हेक्टर 76 आर शासकीय जमीन उपलब्ध. (महसूल) पुरंदर विमानतळ:विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना; भूसंपादन व अनुषंगिक कामांसाठी 6,000 कोटींचे कर्ज; एमआयडीसी, एमएडीसी, सिडको सहभाग. (उद्योग) ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान:2026–27 कालावधी; वार्षिक 80.75 कोटींची तरतूद; ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद स्तरावर पुरस्कार. (सार्वजनिक आरोग्य) एमआयडीसी—रत्नपुरी मळा (इंदापूर):1,000 एकर जमीन नव्या औद्योगिक वसाहतीसाठी हस्तांतरण. (महसूल) मुंबईत महाटेनिस पायाभूत सुविधा:म्हाडाच्या भूखंडांवर संयुक्त भागीदारीत विकास. (गृहनिर्माण) अटल सेतू प्रभाव क्षेत्र विकास धोरण:नव नगर विकास प्राधिकरण क्षेत्रात भूसंपादन व भूवाटप धोरणास मान्यता; ‘तिसरी मुंबई’ला गती. (नगर विकास) राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन बक्षिसांत वाढ:विद्यार्थी, शिक्षक, प्रयोगशाळा परिचरांना लाभ. (शालेय शिक्षण) PPP धोरण–2026:25 कोटींपेक्षा मोठ्या प्रकल्पांना मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीकडून मंजुरी; नियोजन विभागात स्वतंत्र कार्यासन. (नियोजन) ई-मेल नोटीस वैध:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मध्ये दुरुस्ती. (महसूल) परभणी—इंद्राणी सहकारी सूतगिरणी:शासन अर्थसहाय्य. (वस्त्रोद्योग) अपर जिल्हाधिकारी पदनिर्मिती:11 पदांना मान्यता. (महसूल व वन) नागपूर—कोल टू केमिकल प्रकल्प:117.19 हेक्टर जमीन एमआयडीसीला. (महसूल) बारामती क्रीडा संकुल (कटफळ):75.13 कोटींची मंजुरी; पॅव्हेलियन, जलतरण तलाव, स्केटिंग रिंग, आर्चरी, बास्केटबॉल. (शालेय शिक्षण व क्रीडा) धान्य वितरण—एकत्र निविदा प्रक्रिया:मुंबई–ठाणे क्षेत्रातील 5 परिमंडळे व 34 जिल्ह्यांत सुसूत्रता. (अन्न व नागरी पुरवठा) अकोला—लघू पाटबंधारे दुरुस्ती:6.60 कोटी; 255 हेक्टर सिंचन. (मृद व जलसंधारण) कर थकबाकी तडजोड अध्यादेश:कर, व्याज, दंड/विलंब शुल्काबाबत सुधारणा. (वित्त) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दुरुस्ती:कलम 109(3)(घ). (उच्च व तंत्र शिक्षण) खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियम दुरुस्ती:प्रवेश व शुल्क विनियमनात सुधारणा. (उच्च व तंत्र शिक्षण) आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांमुळे सिंचन, आरोग्य, उद्योग, क्रीडा व शहरी विकास या क्षेत्रांना चालना मिळणार आहे. निवडणुकांनंतरच्या पहिल्या महत्त्वाच्या बैठकीत व्यापक विकासाचा अजेंडा पुढे नेण्यात आल्याचे चित्र स्पष्ट झाले. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

राज्य मंत्रिमंडळ बैठक: 19 निर्णय; क्रीडा, सिंचन, आरोग्याला गती Read More »

mahad election

महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व; जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ताब्यात

महाड | कोंकणधारा डेस्क:महाड तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्हा परिषदेच्या पाचही गटांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले, तर पंचायत समितीच्या दहा पैकी नऊ जागांवर या गटाने विजय मिळवला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी पराभव मान्य करत मतमोजणी केंद्रातून निघून जाणे पसंत केले. जिल्हा परिषद गटांचे निकाल महाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच गटांमध्ये खालील उमेदवार विजयी ठरले— या निकालांमुळे जिल्हा परिषदेवर शिवसेना शिंदे गटाची पकड अधिक मजबूत झाली आहे. पंचायत समितीवर नऊ जागांवर विजय पंचायत समितीच्या गणांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या खालील उमेदवारांनी विजय मिळवला याशिवाय सवाने पंचायत समिती गणातील अनिल जाधव हे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. दरम्यान, बिरवाडी पंचायत समिती गणात मयूर पुंडलिक जाधव यांनी विजय मिळवत राष्ट्रवादी–भाजप आघाडीचे एकमेव खाते उघडले आहे. चुरशीच्या लढतीत निर्णायक विजय या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष वेधून घेणाऱ्या लढतींपैकी नडगाव तर्फे बिरवाडी जिल्हा परिषद गट महत्त्वाचा ठरला. येथे राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास भरत गोगावले यांनी तब्बल पाच हजार मतांची आघाडी घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निलेश महाडिक यांचा दारुण पराभव केला. त्याचप्रमाणे करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असलेल्या निलेश ताठरे यांनी सतत चर्चेत असलेले सोमनाथ ओझर्डे यांचा पराभव करत विजय संपादन केला. निवडणूक जिल्हा परिषदेची, गुलाल विधानसभेचा महाड नगरपालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी सुनील तटकरे यांनी भाजपसोबत युती करत ताकद लावली होती. मात्र, मजबूत जनसंपर्क असलेल्या मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा महाड–पोलादपूर तालुक्यावर आपली पकड कायम असल्याचे दाखवून दिले. नगरपालिका निवडणुकीनंतर दोन गटांत झालेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर विकास गोगावले यांचा हा विजय प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. मात्र मोठ्या मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर महाडमध्ये विधानसभा निवडणुकीप्रमाणे गुलाल उधळण्यात आला. राष्ट्रवादी बॅकफूटवर; ठाकरे गटाची मते स्थिर या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहल माणिकराव जगताप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, त्याचा पहिला फटका महाड नगरपालिकेत बसल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही त्यांच्या कुटुंबाची राजकीय ताकद कमी झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मते तुलनेने स्थिर असल्याचे चित्र दिसत असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय मतदारांना पसंत न पडल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे. निष्कर्ष महाड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालामुळे महाड–पोलादपूर पट्ट्यातील आगामी स्थानिक व विधानसभा राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लेखक : कोंकणधारा डेस्क

महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व; जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ताब्यात Read More »

पोलादपूरात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73% मतदान

पोलादपूर तालुक्यात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73 टक्के मतदान

पोलादपूर | प्रतिनिधी – दिनेश चाफळकर:जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यात यंदा ‘दुबार मतदार’ हा कळीचा मुद्दा ठरला आहे. तालुक्यातील २५ ते ३० टक्के मतदार ग्रामीण भागात वास्तव्यास असताना सुमारे ७० टक्के मतदार हे चाकरमानी असल्याने, त्यांना मतदानासाठी गावाकडे आणण्यासाठी उमेदवारांना कोट्यवधी रुपयांचा खर्च सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून आले आहे. विशेष म्हणजे, एवढा खर्च करूनही मतांची खात्री नसल्याने अनेक उमेदवार संभ्रमात असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाहेरून येणाऱ्या मतदारांसाठी ने-आण, जेवण-खाणे, निवास आणि कथित आमिष स्वरूपातील खर्च जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या उमेदवारांना करावा लागत आहे. परिणामी, यंदा रायगड जिल्हा परिषदेच्या दोन गटांतील सहा उमेदवारांपैकी तुल्यबळ लढतीतील चार उमेदवारांना, तसेच पोलादपूर पंचायत समितीच्या चार गणांतील आठ उमेदवारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागल्याचे दिसून आले. 55.73 टक्के मतदान; शेवटच्या तासांत फारशी वाढ नाही सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार पोलादपूर तालुक्यात 55.73 टक्के मतदान झाले. शेवटच्या दोन तासांत मतदानाच्या टक्केवारीत फारशी वाढ झाली नसल्याचे प्रशासनाच्या नोंदींवरून स्पष्ट झाले आहे.दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 11,163 पुरुष आणि 10,705 महिला, असे एकूण 21,868 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटातील उमेदवार अजय सलागरे यांनी कापडे बुद्रुक शाळेत सपत्नीक मतदान केले. निलेश कुंभार यांनी वाकण शाळेत मतदान केले. तर लोहारे गटातील उमेदवार चंद्रकांत कळंबे यांनी उमरठ येथे आणि कृष्णा कदम यांनी ओंबळी येथील प्राथमिक शाळेत मतदान केले. कुठल्या मतदान केंद्रांवर कुणाचे भवितव्य ठरणार? कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गट अंतर्गत माटवण पंचायत समिती गणातील गोवेले, उमरठ, धारवली, कालवली, मोरसडे, बोरघर, आडावळे बुद्रुक, बोरावळे, माटवण, देवळे, वाकण, कापडे बुद्रुक, कापडे खुर्द, चांभारगणी बुद्रुक आणि बोरज येथील मतदार साक्षी कांबळेकर विरुद्ध हर्षदा वरवाटकर, तसेच अजय सलागरे विरुद्ध निलेश कुंभार यांचे भवितव्य ठरवणार आहेत. कापडे बुद्रुक पंचायत समिती गणात देवळे, करंजे, दाभिळ, लहुळसे, केवनाळे, वाकण-१, वाकण-२, नानेघोळ, कापडे खुर्द, कापडे बुद्रुक (१ ते ३), रानकडसरी, रानबाजिरे, चांभारगणी बुद्रुक, निवे, किनेश्वर, साखर येथील मतदारांनी अनिल दळवी विरुद्ध अनिल मालुसरे यांच्यासाठी मतदान केले आहे. लोहारे गटात चौरंगी लढत लोहारे जिल्हा परिषद गटात कृष्णा कदम (कमळ), अ. रझाक करबेलकर (हात), चंद्रकांत कळंबे (शिवसेना) आणि कृष्णा कदम (ढोबळी मिरची) अशी चौरंगी लढत असून, कोतवाल गणातील सुरेंद्र चव्हाण विरुद्ध अविनाश शिंदे यांचेही भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.लोहारे पंचायत समिती गणात युगज्ञा दीपक उतेकर विरुद्ध अनिता अनिल भिलारे यांच्यासाठी विविध गावांतील मतदारांनी मतदान केले. मतदान केंद्रांबाहेर वाहनांची गर्दी तालुक्यातील बहुतांश मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिघाबाहेर लक्झरी बसेस, मोटारकार, जीप आणि खासगी आरामगाड्यांची मोठी गर्दी दिसून आली. सुमारे ७० टक्के मतदार पोलादपूरबाहेरील असल्याने हा खर्च सर्वसामान्य उमेदवारांच्या आवाक्याबाहेर जात असल्याची चर्चा आहे. ‘दुबार मतदार’ प्रश्नावर तोडगा हवा या पार्श्वभूमीवर भविष्यात ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमधील खर्च टाळण्यासाठी पोस्टल मतांचा पर्याय, किंवा आधारकार्डशी मतदार ओळखपत्र जोडून एकाच ठिकाणी मतदानाची व्यवस्था करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.पोलादपूर तालुक्यातील अनेक मतदार मुंबई व ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास असून, काहीजण तिकडील महापालिकांमध्ये नगरसेवकही झाले आहेत. त्यामुळे आधार-मतदार ओळखपत्र लिंकिंग सक्तीचे केल्यास दुबार मतदारांचा प्रश्न स्पष्ट होऊ शकतो, अशी मागणी पुढे येत आहे. निकाल सोमवारी सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, मतमोजणी सोमवारी होणार आहे. पोलादपूर तालुक्यातील ‘दुबार मतदार’ प्रश्नाचा निकालांवर नेमका किती परिणाम होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. लेखक : कोंकणधारा डेस्क

पोलादपूर तालुक्यात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73 टक्के मतदान Read More »

पोलादपूरात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73% मतदान

पोलादपूरात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73% मतदान

पोलादपूर तालुक्यात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73 टक्के मतदान पोलादपूर | प्रतिनिधी – दिनेश चाफळकर:जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यात यंदा ‘दुबार मतदार’ हा कळीचा मुद्दा ठरला आहे. तालुक्यातील २५ ते ३० टक्के मतदार ग्रामीण भागात वास्तव्यास असताना सुमारे ७० टक्के मतदार हे चाकरमानी असल्याने, त्यांना मतदानासाठी गावाकडे आणण्यासाठी उमेदवारांना कोट्यवधी रुपयांचा खर्च सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून आले आहे. विशेष म्हणजे, एवढा खर्च करूनही मतांची खात्री नसल्याने अनेक उमेदवार संभ्रमात असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाहेरून येणाऱ्या मतदारांसाठी ने-आण, जेवण-खाणे, निवास आणि कथित आमिष स्वरूपातील खर्च जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या उमेदवारांना करावा लागत आहे. परिणामी, यंदा रायगड जिल्हा परिषदेच्या दोन गटांतील सहा उमेदवारांपैकी तुल्यबळ लढतीतील चार उमेदवारांना, तसेच पोलादपूर पंचायत समितीच्या चार गणांतील आठ उमेदवारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागल्याचे दिसून आले. 55.73 टक्के मतदान; शेवटच्या तासांत फारशी वाढ नाही सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार पोलादपूर तालुक्यात 55.73 टक्के मतदान झाले. शेवटच्या दोन तासांत मतदानाच्या टक्केवारीत फारशी वाढ झाली नसल्याचे प्रशासनाच्या नोंदींवरून स्पष्ट झाले आहे.दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 11,163 पुरुष आणि 10,705 महिला, असे एकूण 21,868 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटातील उमेदवार अजय सलागरे यांनी कापडे बुद्रुक शाळेत सपत्नीक मतदान केले. निलेश कुंभार यांनी वाकण शाळेत मतदान केले. तर लोहारे गटातील उमेदवार चंद्रकांत कळंबे यांनी उमरठ येथे आणि कृष्णा कदम यांनी ओंबळी येथील प्राथमिक शाळेत मतदान केले. कुठल्या मतदान केंद्रांवर कुणाचे भवितव्य ठरणार? कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गट अंतर्गत माटवण पंचायत समिती गणातील गोवेले, उमरठ, धारवली, कालवली, मोरसडे, बोरघर, आडावळे बुद्रुक, बोरावळे, माटवण, देवळे, वाकण, कापडे बुद्रुक, कापडे खुर्द, चांभारगणी बुद्रुक आणि बोरज येथील मतदार साक्षी कांबळेकर विरुद्ध हर्षदा वरवाटकर, तसेच अजय सलागरे विरुद्ध निलेश कुंभार यांचे भवितव्य ठरवणार आहेत. कापडे बुद्रुक पंचायत समिती गणात देवळे, करंजे, दाभिळ, लहुळसे, केवनाळे, वाकण-१, वाकण-२, नानेघोळ, कापडे खुर्द, कापडे बुद्रुक (१ ते ३), रानकडसरी, रानबाजिरे, चांभारगणी बुद्रुक, निवे, किनेश्वर, साखर येथील मतदारांनी अनिल दळवी विरुद्ध अनिल मालुसरे यांच्यासाठी मतदान केले आहे. लोहारे गटात चौरंगी लढत लोहारे जिल्हा परिषद गटात कृष्णा कदम (कमळ), अ. रझाक करबेलकर (हात), चंद्रकांत कळंबे (शिवसेना) आणि कृष्णा कदम (ढोबळी मिरची) अशी चौरंगी लढत असून, कोतवाल गणातील सुरेंद्र चव्हाण विरुद्ध अविनाश शिंदे यांचेही भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.लोहारे पंचायत समिती गणात युगज्ञा दीपक उतेकर विरुद्ध अनिता अनिल भिलारे यांच्यासाठी विविध गावांतील मतदारांनी मतदान केले. मतदान केंद्रांबाहेर वाहनांची गर्दी तालुक्यातील बहुतांश मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिघाबाहेर लक्झरी बसेस, मोटारकार, जीप आणि खासगी आरामगाड्यांची मोठी गर्दी दिसून आली. सुमारे ७० टक्के मतदार पोलादपूरबाहेरील असल्याने हा खर्च सर्वसामान्य उमेदवारांच्या आवाक्याबाहेर जात असल्याची चर्चा आहे. दुबार मतदार’ प्रश्नावर तोडगा हवा या पार्श्वभूमीवर भविष्यात ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमधील खर्च टाळण्यासाठी पोस्टल मतांचा पर्याय, किंवा आधारकार्डशी मतदार ओळखपत्र जोडून एकाच ठिकाणी मतदानाची व्यवस्था करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.पोलादपूर तालुक्यातील अनेक मतदार मुंबई व ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास असून, काहीजण तिकडील महापालिकांमध्ये नगरसेवकही झाले आहेत. त्यामुळे आधार-मतदार ओळखपत्र लिंकिंग सक्तीचे केल्यास दुबार मतदारांचा प्रश्न स्पष्ट होऊ शकतो, अशी मागणी पुढे येत आहे. निकाल सोमवारी सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, मतमोजणी सोमवारी होणार आहे. पोलादपूर तालुक्यातील ‘दुबार मतदार’ प्रश्नाचा निकालांवर नेमका किती परिणाम होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

पोलादपूरात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73% मतदान Read More »

श्रीराम महादेववाडीतील चिमुकल्यांनी भरवले अंडर-14 क्रिकेट सामने

महादेववाडी | कोंकणधारा डेस्क:श्रीराम महादेववाडी येथे चिमुकल्यांनी आयोजित केलेल्या १४ वर्षांखालील वयोगटातील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पार पडून सामने सुरू झाले आहेत. ही स्पर्धा आजपासून सुरू असून उद्या पर्यंत सामने सुरू राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या स्पर्धेत विभागातील आंबेवाडी, मोहोल्ला, महादेववाडी, बैतवाडी, कोलाडवाडी, पुई तसेच परिसरातील इतर संघांनी सहभाग नोंदवला आहे. रायगड जिल्ह्यात क्रिकेटची मोठी परंपरा असून प्रामुख्याने प्रौढ वयोगटातील भव्य स्पर्धा पाहायला मिळतात. मात्र, चिमुकल्यांनी स्वतः पुढाकार घेत भरवलेली ही स्पर्धा विशेष कौतुकास्पद ठरत आहे. 🏏 सामने रंगात; चिमुकल्यांचा उत्साह शिगेला स्पर्धेच्या उद्घाटनानंतर सामने चांगलेच रंगले असून मैदानावर खेळाडूंचा उत्साह, शिस्त आणि संघभावना पाहायला मिळत आहे. लहान वयातच स्पर्धात्मक खेळाचा अनुभव मिळाल्याने भविष्यातील खेळाडू घडण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. 🏆 पारितोषिकांची घोषणा; वितरण उद्या या स्पर्धेसाठी पारितोषिकांची आधीच घोषणा करण्यात आली असून,प्रथम पारितोषिक – संतोष बैत (अण्णा)द्वितीय पारितोषिक – चिरंजीव भिंगारेतृतीय पारितोषिक – प्रणय सागवेकर तसेच मॅन ऑफ द मॅच (बॉलर) आणि मॅन ऑफ द मॅच (बॅट्समन) या विशेष पुरस्कारांचे वितरण उद्या अंतिम सामन्यानंतर करण्यात येणार आहे. या विशेष पारितोषिकांसाठी VRO समूहाकडून सहकार्य लाभत आहे. 🧒 स्थानिकांकडून कौतुक या स्पर्धेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, लहान वयातच अशा उपक्रमांमधून खेळाडू घडतात, अशी भावना पालक व क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

श्रीराम महादेववाडीतील चिमुकल्यांनी भरवले अंडर-14 क्रिकेट सामने Read More »

महावितरणच्या कोलाड विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याची मुजोरी ! वैयक्तिक थकबाकी न भरल्यास कंपनीचा वीजपुरवठा तोडण्याची धमकी; नियमांची पायमल्ली?

कोंकणधारा प्रतिनिधी | रोहामहावितरणच्या सोनवणे ह्या कनिष्ठ अभियंत्याकडून (JE) वैयक्तिक वीजमीटरवरील थकबाकी न भरल्यास खासगी मर्यादित कंपनीच्या (Pvt Ltd) नावावरील वीजपुरवठा तोडण्याची उघड धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, कंपनीच्या नावावरील वीजबिल नियमितपणे भरलेले असून कोणतीही थकबाकी नसताना हा दबाव टाकण्यात आल्याचा आरोप संबंधित ग्राहकाने केला आहे. हा प्रकार महावितरण च्या नियमांनाच नव्हे, तर विद्युत अधिनियम आणि प्रशासकीय शिस्तीलाही थेट आव्हान देणारा ठरत आहे. दोन मीटर, दोन स्वतंत्र ग्राहक – तरीही दबाव का? संबंधित ठिकाणी एकाच जागी दोन स्वतंत्र वीज कनेक्शन आहेत. एक कनेक्शन वैयक्तिक नावावर असून त्या मीटरचा वीजपुरवठा खंडित असतानाही तब्बल एका वर्षासाठी किमान (Minimum) वीजबिल आकारण्यात आले. त्यामुळे सुमारे ४२ हजार रुपयांची थकबाकी निर्माण झाली. या थकबाकीबाबत ग्राहकाने हरकती नोंदवल्या असतानाही, त्याच ठिकाणी असलेल्या आणि नियमितपणे वीजबिल भरणाऱ्या खासगी कंपनीच्या वीजपुरवठ्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप आहे. ग्राहकाच्या म्हणण्यानुसार, “वैयक्तिक थकबाकी भरली नाही, तर कंपनीचा वीजपुरवठा कापू,”अशी थेट तोंडी धमकी कनिष्ठ अभियंत्याकडून देण्यात आली. कायदा स्पष्ट असताना अधिकारांचा गैरवापर? विद्युत अधिनियम, 2003 च्या कलम 56 नुसार, कोणत्याही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी त्या त्याच ग्राहकाला लेखी नोटीस देणे बंधनकारक आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही कारवाई केवळ त्या ग्राहक क्रमांकापुरतीच मर्यादित असते. तसेच महाराष्ट्र वीज नियामक आयोग (MERC) च्या पुरवठा संहितेत स्पष्टपणे नमूद आहे की, “एका ग्राहकाची थकबाकी दुसऱ्या स्वतंत्र ग्राहकाच्या वीजपुरवठ्यावर लागू करता येत नाही.” तज्ज्ञांच्या मते, वैयक्तिक ग्राहक आणि खासगी मर्यादित कंपनी हे कायदेशीरदृष्ट्या दोन स्वतंत्र घटक (Independent Legal Entities) आहेत. त्यामुळे एका ग्राहकाच्या थकबाकीचा आधार घेऊन दुसऱ्या ग्राहकावर दबाव टाकणे हे नियमबाह्य असून प्रशासकीय मनमानी ठरू शकते. तोंडी धमकी, लेखी आदेश नाही महावितरणच्या कार्यपद्धतीनुसार कोणतीही वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई ही लेखी नोटीस, वरिष्ठ अधिकाऱ्यांची मान्यता आणि नियमानुसार प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच केली जाते. मात्र या प्रकरणात कोणतीही लेखी नोटीस किंवा आदेश नसून केवळ तोंडी धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांच्या मर्यादा ओलांडल्याची चर्चा सुरू झाली आहे. ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण या घटनेमुळे औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.“आज वैयक्तिक थकबाकीपोटी कंपनीवर कारवाई होत असेल, तर उद्या कुणाच्याही वीजपुरवठ्यावर मनमानी होऊ शकते,” अशी भावना अनेक उद्योजक आणि व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. पुढे काय? प्रशासनाची भूमिका काय असणार या गंभीर प्रकरणाबाबत संबंधित ग्राहकाने महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच गरज भासल्यास ग्राहक तक्रार निवारण मंच (CGRF) आणि वीज लोकपाल (Ombudsman) यांच्याकडेही दाद मागण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नियम स्पष्ट असताना आणि कंपनीचे वीजबिल नियमित भरलेले असतानाही दबाव टाकण्यासाठी वीजपुरवठा तोडण्याची धमकी दिली जात असेल, तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

महावितरणच्या कोलाड विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याची मुजोरी ! वैयक्तिक थकबाकी न भरल्यास कंपनीचा वीजपुरवठा तोडण्याची धमकी; नियमांची पायमल्ली? Read More »

पनवेल महापालिका: भाजपकडून महापौर–उपमहापौर उमेदवार जाहीर

पनवेल महानगरपालिकेसाठी भाजपकडून महापौर व उपमहापौर पदाचे उमेदवार जाहीर पनवेल | प्रतिनिधी – संकेत गायकवाड:पनवेल महानगरपालिकेच्या आगामी सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष यांनी महत्त्वाचा निर्णय घेत महापौर व उपमहापौर पदासाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपकडून महापौर पदासाठी श्री. नितीनभाई पाटील तर उपमहापौर पदासाठी सौ. प्रमिला रवींद्र पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. या घोषणेमुळे पनवेलच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, महापालिकेच्या नेतृत्वाबाबतचे चित्र मोठ्या प्रमाणात स्पष्ट झाले आहे.सत्तास्थापनेच्या दृष्टीने महत्त्वाची घोषणा पनवेल महानगरपालिकेतील सत्तास्थापनेसाठी भाजपकडून करण्यात आलेली ही घोषणा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. महापौर आणि उपमहापौर हे महापालिकेतील सर्वोच्च पदे असल्याने, या पदांवर कोण नेतृत्व करणार याकडे शहरातील नागरिकांपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत सर्वांचे लक्ष लागले होते. उमेदवार जाहीर होताच आता सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. विकासकेंद्री नेतृत्वावर भाजपचा भर भाजपने नितीनभाई पाटील आणि प्रमिला रवींद्र पाटील यांची निवड करताना शहराच्या विकासासाठी सक्षम, अनुभवी आणि समन्वयात्मक नेतृत्व देण्याचा विचार केल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पनवेल शहर झपाट्याने विकसित होत असून, वाढती लोकसंख्या, पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि नागरी सुविधा हे प्रमुख प्रश्न आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या नेतृत्वाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह उमेदवारांच्या घोषणेनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी अभिनंदनाचे संदेश, सोशल मीडियावर शुभेच्छा आणि कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. आगामी महापालिका कामकाजात भाजपचे नेतृत्व कसे राहील, याबाबत सकारात्मक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. 🔍 पुढील घडामोडींवर लक्ष महापौर व उपमहापौर उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता प्रत्यक्ष निवड प्रक्रिया, पदभार स्वीकारण्याची तारीख आणि महापालिकेतील सत्तावाटप याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच विरोधी पक्षांची भूमिका काय असेल, यावरही पनवेलच्या राजकारणात पुढील समीकरणे ठरणार आहेत. पनवेल महानगरपालिकेसाठी भाजपने महापौर व उपमहापौर पदांचे उमेदवार जाहीर करत सत्तास्थापनेच्या दिशेने ठोस पाऊल टाकले आहे. नितीनभाई पाटील आणि प्रमिला रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहराच्या विकासाला कोणती दिशा मिळते, याकडे आता नागरिकांसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

पनवेल महापालिका: भाजपकडून महापौर–उपमहापौर उमेदवार जाहीर Read More »

महाड ZP–पं.स. निवडणूक: ७ फेब्रुवारीला कडक पोलीस बंदोबस्त

महाड ZP–पं.स. निवडणूक: अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त महाड | प्रतिनिधी – दिनेश चाफळकर:येत्या ७ फेब्रुवारी २०२६ रोजी महाड तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच मतदान प्रक्रिया निर्भय, शांततामय आणि पारदर्शक पार पडावी, यासाठी कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी एकूण ४५८ होमगार्ड, ३२३ पोलीस अंमलदार, १७ अधिकारी आणि दोन स्पेशल फोर्स निवडणूक काळात कार्यरत राहणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक; संवेदनशीलतेची पार्श्वभूमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिसऱ्या टप्प्यात ७ फेब्रुवारी रोजी महाड तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ५ गट आणि पंचायत समितीसाठी १० गण यांची निवडणूक होत आहे. काही दिवसांपूर्वीच महाड नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्या मतदानाच्या दिवशी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात झालेल्या राडा-प्रकरणामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती ग्रामीण भागात होऊ नये, यासाठी यावेळी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. संचलन व प्रतिबंधात्मक उपाय निवडणूकपूर्व तयारीचा भाग म्हणून दासगाव, खर्डी आणि बिरवाडी बाजारपेठ या तीन संवेदनशील ठिकाणी पोलिसांमार्फत दोन दिवसांपूर्वी संचलन (रूट मार्च) करण्यात आले. या संचलनाद्वारे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे, समाजकंटकांवर वचक ठेवणे आणि संभाव्य अनुचित प्रकारांना आळा घालणे, हा उद्देश असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. २०३ मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त महाड तालुक्यात एकूण २०३ मतदान केंद्रे आहेत. या अंतर्गत महाड शहर, महाड तालुका आणि एमआयडीसी अशी तीन पोलीस ठाणे कार्यरत आहेत. निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून हा बंदोबस्त ६ आणि ७ फेब्रुवारी या दोन दिवसांसाठी राहणार आहे. पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्ताची आकडेवारी निवडणूक बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाने पुढीलप्रमाणे मनुष्यबळ तैनात केले आहे— एमआयडीसी पोलीस ठाणे:१०५ होमगार्ड, ६५ पोलीस अंमलदार महाड शहर पोलीस ठाणे:२१२ होमगार्ड, १८८ पोलीस अंमलदार आणि १२ अधिकारी महाड तालुका पोलीस ठाणे:१४१ होमगार्ड, ७० पोलीस अंमलदार आणि ५ अधिकारी या तिन्ही पोलीस ठाण्यांच्या अखत्यारीत एकूण ४५८ होमगार्ड, ३२३ पोलीस अंमलदार आणि १७ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, एक प्लाटून (१ अधिकारी व २३ पोलीस अंमलदार) तसेच एक सेक्शनमध्ये ८ पोलीस अंमलदार स्वतंत्रपणे तैनात राहणार आहेत. गावपातळीवरही सतर्कता महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राडा-प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, यावेळी गावपातळीवरील पोलीस पाटील यांनाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. संशयास्पद हालचाली, जमाव जमवणे, दारू-प्रलोभन किंवा अफवा पसरवण्याचे प्रकार आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कायदा-सुव्यवस्था राखण्यावर भर पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, निवडणूक काळात आचारसंहितेचे उल्लंघन, जमावबंदी आदेशांचे उल्लंघन, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न किंवा मतदान प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाईल. शांततामय निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. महाड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शांततेत आणि सुरळीत पार पडाव्यात, यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ, स्पेशल फोर्स, संचलन आणि गावपातळीवरील सतर्कतेच्या उपाययोजनांमुळे कोणताही अनुचित प्रकार टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न स्पष्ट दिसून येतो. आता ७ फेब्रुवारी रोजी मतदारांचा प्रतिसाद आणि निवडणूक प्रक्रियेतील शिस्त याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

महाड ZP–पं.स. निवडणूक: ७ फेब्रुवारीला कडक पोलीस बंदोबस्त Read More »

मुंबई–पुणे एक्स्प्रेसवे 32 तास ठप्प; मुख्यमंत्र्यांचे चौकशी आदेश

मुंबई–पुणे एक्स्प्रेसवे 32 तास ठप्प; चौकशीचे आदेश, राजकीय प्रतिक्रिया तीव्र मुंबई | कोंकणधारा डेस्क:मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर टँकर पलटी झाल्याने निर्माण झालेल्या भीषण वाहतूककोंडीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. या घटनेमुळे तब्बल 32 तास हा महत्त्वाचा महामार्ग ठप्प झाला होता. हजारो प्रवासी, खासगी वाहने, अवजड ट्रक आणि बस या कोंडीत अडकल्या होत्या. अनेक प्रवाशांना पाणी, अन्न आणि वैद्यकीय मदतीअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. टँकर हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्याचे जाहीर करण्यात आले असले, तरी 24 तास उलटूनही बोरघाट परिसरात पुन्हा वाहने बंद पडल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. नेमकं काय घडलं? 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर गॅसचा टँकर पलटी झाला. संभाव्य धोका लक्षात घेऊन सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ वाहतूक थांबवण्यात आली. मात्र टँकर हटविण्याची प्रक्रिया, पर्यायी मार्गांची व्यवस्था आणि आपत्कालीन यंत्रणांचा समन्वय अपेक्षित गतीने न झाल्याने वाहतूककोंडी तासन्‌तास वाढत गेली. परिणामी तब्बल 32 तास प्रवासी अडकून पडले आणि महामार्गावरील हालअपेष्टांचे दृश्य सर्वत्र चर्चेचा विषय ठरले. 🛣️ बोरघाटात पुन्हा वाहतूक ठप्प टँकर हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात बोरघाट परिसरात अनेक अवजड वाहने बंद पडल्याने पुन्हा एकदा संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. जोपर्यंत ही वाहने हटविली जाणार नाहीत, तोपर्यंत वाहतूक पूर्णपणे सुरळीत होणे कठीण असल्याचे प्रत्यक्षदर्शी आणि वाहतूक पोलिसांनी सांगितले. यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप आणि प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे. मुख्यमंत्र्यांची दखल; चौकशीचे आदेश या गंभीर घटनेची दखल देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि घडल्यास तत्काळ व परिणामकारक उपाययोजना कशा करता येतील, याबाबत चौकशी करून शिफारसींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी एमएसआरडीसी ला दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत महामार्गावर वाहतूक व्यवस्थापन, अवजड वाहनांची हालचाल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस आराखडा असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश या वाहतूककोंडीची गंभीर दखल एकनाथ शिंदे यांनीही घेतली आहे. त्यांनी आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देत, दीर्घकालीन उपाययोजनांवर भर दिला आहे. या मार्गावर वारंवार होणाऱ्या कोंड्या आणि अपघात लक्षात घेता, पायाभूत सुविधांची सुधारणा तातडीने आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले. राज ठाकरेंचा सरकारला सवाल या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांनी सरकार आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग जवळपास 32 तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि नेहमीप्रमाणे सरकारकडून फक्त चौकशीचे आदेश दिले गेले,” असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, “अशा अनेक घटनांच्या चौकशा होतात; पण त्यातून प्रशासन काही बोध घेतो का, हा खरा प्रश्न आहे.” टँकर पलटीनंतर सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक थांबवणे योग्य होते, हे मान्य करताना त्यांनी प्रशासनाकडे किमान वेळेत रस्ता मोकळा करण्याचा कृती आराखडा तयार होता का, असा थेट सवालही उपस्थित केला. प्रवाशांचे हाल आणि जनतेचा रोष वाहतूक ठप्प राहिल्याने प्रवाशांना उघड्यावर रात्र काढावी लागली. काही ठिकाणी अन्न-पाण्याची टंचाई, वृद्ध व लहान मुलांचे हाल आणि रुग्णवाहिकांना मार्ग न मिळण्याच्या घटनाही समोर आल्या. सोशल मीडियावरून अनेकांनी प्रशासनाच्या तयारीअभावी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ही घटना केवळ एक अपघात नसून आपत्कालीन व्यवस्थापनातील उणिवा उघड करणारी ठरली आहे. चौकशी अहवाल आणि राजकीय आश्वासनांपलीकडे जाऊन ठोस कृती आराखडा, तांत्रिक सज्जता आणि समन्वयाची गरज अधोरेखित झाली आहे. भविष्यात अशा घटनांमुळे प्रवाशांना पुन्हा हाल सहन करावे लागू नयेत, यासाठी प्रशासन काय पावले उचलते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

मुंबई–पुणे एक्स्प्रेसवे 32 तास ठप्प; मुख्यमंत्र्यांचे चौकशी आदेश Read More »