konkandhara.com

24 सितम्बर 2025

खड्डेमुक्त मुंबई, आरोग्य सेवा आणि गृहनिर्माणाला गती! – मोठी घोषणा

मुंबई : जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात येणारी सर्व विकासकामे उच्च दर्जाची असावीत आणि ठरलेल्या मुदतीत पूर्ण व्हावीत, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. वर्ल्ड ट्रेड सेंटर कॉम्प्लेक्स येथे झालेल्या मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवण्यासाठी गृहनिर्माण, आरोग्य, रस्ते, स्वच्छता आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांवर भर देण्याची घोषणा केली. या बैठकीला मंत्री मंगल प्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, आयुक्त भूषण गगराणी, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत 2025–26 या वर्षासाठी 553 कोटी रुपयांचा वार्षिक निधी मंजूर करण्यात आला. यात सर्वसाधारण योजनेसाठी 528 कोटी, तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 22 कोटी रुपयांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्र्यांनी हा निधी मंजूर प्रकल्पांवर वेळेत खर्च होईल, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “मुंबईतील रखडलेले गृहप्रकल्प प्राधान्याने मार्गी लावले जातील. एसआरए, म्हाडा, एमएमआरडीए, सिडको आणि महानगरपालिका या संस्थांनी समन्वय साधून तातडीने कारवाई करावी.” आरोग्य सेवेत सुधारणा करण्यासाठी “हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना” सुरू करण्यात आली असून, महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये आधुनिक एमआरआय मशीन उपलब्ध करून दिली जाणार आहेत. शहरात स्वच्छता मोहीम, प्रदूषण नियंत्रण, वृक्षारोपण यांना गती देण्याबरोबरच खड्डेमुक्त रस्ते, उद्यानांचे पुनर्वसन आणि पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा या कामांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबईतील पोलिसांच्या घरकुलाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. जिल्हा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी वार्षिक योजनेतील 33 टक्के निधी राखीव ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले. 2028 पर्यंत मुंबई जिल्ह्याचा GDP दुप्पट करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले असून मत्स्यव्यवसाय, रत्न-दागिने, लेदर, पर्यटन, आरोग्य, वाहतूक आणि रिअल इस्टेट क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे.

खड्डेमुक्त मुंबई, आरोग्य सेवा आणि गृहनिर्माणाला गती! – मोठी घोषणा Read More »

तर सरकारला स्वस्त बसू देणार – बच्चू कडूंचा इशारा

चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा सरकारला कठोर शब्दांत इशारा देत माजी आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. “जोपर्यंत शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत सरकारला स्वस्त बसू देणार नाही. वेळ आली तर नेपाळसारखे घरात घुसू,” अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी गावात झालेल्या जनसभेत ते बोलत होते. या सभेत कडू यांनी शेतकरी आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. “सरकार शेतकऱ्यांना सातत्याने लुटत आहे. आम्हाला पेटवणं जमणार नाही, पण घरात बांधून ठेवण्याची ताकद आहे,” असं म्हणत त्यांनी सरकारला लक्ष्य केलं. यावेळी कडू यांनी शेतकऱ्यांसाठी 28 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आंदोलनाची रूपरेषाही स्पष्ट केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, शेतमालाला भाव द्यावा यासाठी ते गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मागणी करत आहेत. “देशातील 200 उद्योगपत्यांचे 18 ते 24 लाख कोटी कर्ज सरकार माफ करू शकते, पण शेतकऱ्यांचे 30–40 हजार कोटींचं कर्ज माफ करायला तयार नाही. सोयाबीन, तूर, धान याला 20 टक्के बोनस आणि जीएसटीचा परतावा द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी इशारा दिला की, “15 ऑक्टोबरच्या आत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली नाही, तर आम्ही सोयाबीन कलेक्टर आणि पालकमंत्र्यांच्या घरात नेऊन ठेवणार.” सभाेत बोलताना बच्चू कडू यांनी पुढे सांगितले, “मी कुठल्याही जातीसाठी बोलणार नाही. प्रत्येक जातीने आपले आरक्षणासाठी लढावं, पण मी फक्त शेतकऱ्यांसाठी लढणार. शेतकरी हा प्रत्येक जाती-धर्मात आहे. त्यांच्यासाठी मी आयुष्य वाहणार आहे.” गोरक्षणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. “गोरक्षणाच्या नावाखाली काही गुंड-कार्यकर्त्यांचे पोट भरते, पण गाईला शेतकऱ्यांकडे ठेवलं तर काहीच मदत मिळत नाही. गोरक्षकांना अनुदान देता, मग शेतकऱ्यांना का नाही?” असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, गोदावरी पट्टा पूरग्रस्त असतानाही मुख्यमंत्री फडणवीस दौऱ्यावर गेले नाहीत, अशी टीकाही कडू यांनी यावेळी केली. “हेच लोक उद्धव ठाकरेंना नाव ठेवत होते, पण आता स्वतः ऑनलाईन झाले आहेत,” असे म्हणत त्यांनी टोला लगावला.

तर सरकारला स्वस्त बसू देणार – बच्चू कडूंचा इशारा Read More »

मुंबई : सदा सरवणकर यांच्या वक्तव्यावरून गदारोळ; महेश सावंतांची शिंदेंसमोर आक्रमक भूमिका

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शनिवारी मोठा गदारोळ झाला. शिवसेना (ठाकरे गट) आमदार महेश सावंत यांनी थेट पोस्टर दाखवत सरवणकरांच्या दोन दिवसांपूर्वीच्या वक्तव्याचा उल्लेख केला आणि सरकारवर जोरदार टीका केली. सरवणकर यांनी नुकतंच, “आमदारांना दोन कोटी निधी मिळतो, पण मी आमदार नसतानाही मला 20 कोटींचा निधी मिळतो,” असं विधान केलं होतं. याच पार्श्वभूमीवर सावंत यांनी बैठकीत संताप व्यक्त केला. “तुमच्या आमदारांना तुम्ही निधी दिलात आणि त्यांनी स्वतःचा विकास केला. पण आम्हाला निधी मिळत नाही. माजी आमदार बोलत आहेत की त्यांना 20 कोटी निधी मिळतो, आणि आम्हाला निधी मिळत नाही,” असा सवाल सावंतांनी थेट पालकमंत्री एकनाथ शिंदेंसमोर केला. यावेळी सावंतांनी आणखी कठोर शब्दांत इशारा दिला – “तुमच्या नावाने दादागिरी सुरू आहे, पण आम्हीही ‘दादा’गिरीतून आलो आहोत. माजी आमदारांना खूप निधी दिला, पण कामे झाली नाहीत. त्यांनी तो निधी स्वतःचा विकास करण्यासाठी वापरला आहे. त्यामुळे साहेब, तुम्ही तुमच्या माजी आमदारांना समज द्यावी, त्यांना कानमंत्र द्यावा.” दरम्यान, सावंत यांनी स्थानिक विकासाच्या विविध मागण्याही पुढे केल्या. माहिम किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी निधी द्यावा, माहिममध्ये सायकलिंग ट्रॅक उभारावा, तसेच जीर्ण अवस्थेतील शाळांची डागडुजी करून विद्यार्थ्यांना वर्ग मिळावेत, अशी मागणी त्यांनी केली. सिद्धिविनायक मेट्रो स्थानकासमोरील आकर्षक हत्तीचा पुतळा आजही बसविला गेला नाही, कारण मेट्रो आणि पालिकेत ताळमेळ नाही, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. याशिवाय, दादर विभागातील पोलीस स्थानक म्हाडाच्या इमारतीत कार्यरत आहे, त्याला स्वतंत्र जागा द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. तसेच, मुंबईतील सर्व पुतळ्यांजवळ सीसीटीव्ही बसविण्याचं आवाहनही त्यांनी केलं. या सर्व प्रकरणामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वातावरण तापलं आणि विरोधी पक्षाचा आमदार निधी या प्रश्नावरून आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

मुंबई : सदा सरवणकर यांच्या वक्तव्यावरून गदारोळ; महेश सावंतांची शिंदेंसमोर आक्रमक भूमिका Read More »

मराठवाडा पूरस्थिती गंभीर! आतापर्यंत 8 जणांचा बळी

मुंबई | मराठवाड्यात आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं लागलं आहे. शेती पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून जनावरांचंही मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक ठिकाणी बचाव पथकं अद्यापही कार्यरत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर, धाराशिव व बीड जिल्ह्यांचा दौरा करतील, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव जिल्ह्यात पूरस्थितीची पाहणी करतील. संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री देखील आपल्या जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासूनच्या मुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत एकूण 23 टक्के शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हवामान विभागानं पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या परिस्थितीत विरोधकांनी सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे खासदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर करण्याची मागणी केली. सुप्रिया सुळे यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करून त्यासाठीचा निधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी मात्र पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत जाहीर केली आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, पुढील आठ दिवसांत 2,215 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. तसेच सर्व मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, अनेक आमदार-खासदार पूरग्रस्त भागात उतरले आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी परांडा तालुक्यात एक आजी आणि तिच्या दोन वर्षांच्या नातवाला पूरातून वाचवले. काँग्रेस आमदार अमित देशमुख, शिवसेना आमदार अब्दुल सत्तार, मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप आमदार सुरेश धस यांनीही पूरग्रस्त गावांना भेटी देऊन मदतकार्याचा आढावा घेतला आहे. मराठवाड्यातील पूरस्थिती अद्याप गंभीर असून शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. पुढील काही दिवसांत राज्य सरकार आणि प्रशासन कोणती ठोस पावलं उचलतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

मराठवाडा पूरस्थिती गंभीर! आतापर्यंत 8 जणांचा बळी Read More »

जगप्रसिद्ध अंपायर डिकी बर्ड यांचे निधन; 92 व्या वर्षी अखेरचा निरोप

क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि आदरणीय अंपायर डिकी बर्ड (Dickie Bird) यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. इंग्लंडच्या यॉर्कशर क्लबकडून त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती देण्यात आली. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) देखील श्रद्धांजली अर्पण करत म्हटले की, “डिकी बर्ड हे केवळ यॉर्कशरचे अभिमान नव्हते, तर संपूर्ण जगातील क्रिकेटप्रेमींचे लाडके अंपायर होते.” डिकी बर्ड यांनी आपल्या कारकिर्दीत 150 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग केली. 1975, 1979 आणि 1983 या सलग तीन वर्ल्ड कप अंतिम सामन्यांमध्ये अंपायरिंग करणारे ते जगातील पहिले अंपायर होते. विशेष म्हणजे, 1983 च्या अंतिम सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करून पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. मोहिंदर अमरनाथच्या निर्णायक एलबीडब्लू निर्णयावेळी डिकी बर्ड यांनी हात वर करत “आऊट” दिला आणि त्याच क्षणी भारतीय क्रिकेटचा सुवर्णअध्याय लिहिला गेला. 1933 मध्ये इंग्लंडच्या बार्न्सले येथे जन्मलेले बर्ड सुरुवातीला फर्स्ट क्लास क्रिकेटपटू होते. मात्र फलंदाज म्हणून फारसं यश न मिळाल्याने त्यांनी 32 व्या वर्षी खेळाला अलविदा करून अंपायरिंगकडे वळण्याचा निर्णय घेतला. 1970 मध्ये काउंटी चॅम्पियनशिपमधून त्यांनी अंपायरिंगची सुरुवात केली आणि 1973 मध्ये इंग्लंड–न्यूझीलंड कसोटीमधून आंतरराष्ट्रीय अंपायरिंगमध्ये पदार्पण केले. पुढील दोन दशकांत डिकी बर्ड जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि आदरणीय अंपायर म्हणून ओळखले गेले. एकूण 66 कसोटी आणि 69 एकदिवसीय सामने त्यांनी निर्णयक्षमतेने पार पाडले. 1996 मध्ये भारताविरुद्धच्या टेस्ट सामन्यात त्यांनी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना अंपायर केला. याच सामन्यात सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी कसोटी पदार्पण केले होते. सामन्यानंतर दोन्ही संघांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देत सन्मानित केले होते. डिकी बर्ड यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वाने एक साधा, अचूक आणि खेळाडूंच्या मनात कायम घर करून राहिलेला अंपायर गमावला आहे. अंपायरिंगची व्यावसायिक प्रतिष्ठा वाढविण्यात त्यांचे योगदान अनमोल राहील.

जगप्रसिद्ध अंपायर डिकी बर्ड यांचे निधन; 92 व्या वर्षी अखेरचा निरोप Read More »

शिर्डी साई संस्थानवर 6 सदस्यीय समितीचा प्रस्ताव रद्द; उच्च न्यायालयाने दिला राज्य सरकारला जबर धक्का!

अहिल्यानगर : शिर्डी साई संस्थान समिती प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दणका दिला आहे. सरकारकडून नेमण्यात येणाऱ्या सहा सदस्यीय समितीला न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्य सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राज्य सरकारने संस्थानवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी सहा सदस्यीय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती, तर जिल्हाधिकारी सहअध्यक्ष म्हणून काम पाहणार होते. याशिवाय, स्थानिक आमदार, नगराध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समितीत सदस्य म्हणून सहभागी होणार होते. या प्रस्तावावर आधारित संस्थानकडून उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांना शिफारस पाठविण्यात आली होती. मात्र, याविरोधात सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी याचिका दाखल केली होती. सुनावणीत न्यायालयाने समितीच्या नेमणुकीवर आक्षेप घेत स्पष्ट स्थगिती दिली. दरम्यान, सुनावणीदरम्यान शिर्डी साई संस्थाननेच माघार घेतली. शासनाच्या सूचनेनुसार प्रस्ताव पुढे नेण्यात आला होता, पण न्यायालयीन प्रक्रियेत संस्थानने प्रस्ताव मागे घेतल्याने राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिर्डी साईबाबा संस्थान सध्या त्रिसदस्यीय समितीकडे चालवले जाते. व्यवस्थापन आणि कार्यान्वयन अधिक प्रभावी करण्यासाठी सहा सदस्यीय समितीची शिफारस करण्यात आली होती. मात्र, न्यायालयीन स्थगितीनंतर आता संस्थानच्या कारभाराचे भवितव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानवर नवीन विश्वस्त मंडळ स्थापन केले जाईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारला न्यायालयीन झटका बसल्यानंतर पुढील पावले काय असतील याची उत्सुकता वाढली आहे.

शिर्डी साई संस्थानवर 6 सदस्यीय समितीचा प्रस्ताव रद्द; उच्च न्यायालयाने दिला राज्य सरकारला जबर धक्का! Read More »

यवतमाळनंतर चिपळूणमध्येही TWJ कंपनीचा मोठा घोटाळा! 28 लाख 50 हजारांची भावंडांची फसवणूक

रत्नागिरी : यवतमाळ जिल्ह्यातील 39 लाखांच्या फसवणुकीनंतर आता चिपळूणमध्येही ट्रेड विथ जॅझ (TWJ) कंपनीच्या फसवणुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. चिपळूण शहरातील भावंडांची तब्बल 28 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, या प्रकरणी कंपनीच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण शहरातील इंटक भवन येथे असलेल्या TWJ कंपनीच्या कार्यालयातून हा सगळा कारभार चालत होता. आरोपी समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर, संकेश घाग आणि सिद्धेश कदम यांनी स्वत:ला कंपनीचे प्रतिनिधी सांगत प्रतिक दिलीप माटे आणि त्यांची बहीण तृप्ती दिलीप माटे यांचा विश्वास संपादन केला. महिन्याला 3 ते 4 टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांनी प्रतिक माटे यांच्याकडून 3.5 लाख आणि त्यांच्या बहिणीकडून 25 लाख रुपये गुंतवून घेतले. जानेवारी 2023 पासून आजपर्यंत या दोघांनी मिळून 28.5 लाख रुपये गुंतवले. मात्र, मे 2025 नंतर कंपनीने कोणताही परतावा दिला नाही. वारंवार मागणी करूनही मूळ रक्कमही न परतवल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर प्रतिक माटे यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, TWJ कंपनीने गुंतवणूकदारांना सुरुवातीला मोठा नफा दाखवून आकर्षित केले होते. एका लाख रुपयांवर महिन्याला 7 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात होते. हळूहळू हा दर 6, 5, 4 आणि 3 टक्क्यांपर्यंत कमी झाला. काही गुंतवणूकदारांनी सुरुवातीला दामदुप्पट नफा घेतला, त्यामुळे लोकांचा विश्वास बसला आणि गुंतवणुकीचा ओघ वाढत गेला. पुढे कंपनीने गुंतवणूक थांबवली आणि फसवणूक उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने पोलीस, डॉक्टर, इंजिनियर, व्यापारी अशा हाय-प्रोफाईल लोकांकडून करोडो रुपये गोळा केले असून, हा गैरव्यवहार तब्बल 1000 ते 1200 कोटी रुपयांचा असल्याची चर्चा आहे. कंपनीकडे इव्हेंट, इन्फ्रा, हॉस्पिटॅलिटी, लर्निंग, लॉजिस्टीक अशा विविध उपकंपन्या असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या अवास्तव आमिषांना बळी न पडता, योग्य पडताळणी करूनच गुंतवणूक करावी.

यवतमाळनंतर चिपळूणमध्येही TWJ कंपनीचा मोठा घोटाळा! 28 लाख 50 हजारांची भावंडांची फसवणूक Read More »