अलिबाग : पर्यटन नगरी अलिबागमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर रेंटल बाईक व्यवसायामुळे स्थानिक परवानाधारक रिक्षाचालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांनी अलिबाग पोलीस स्टेशनला निवेदन देऊन या रेंटल बाईकवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रिक्षाचालकांच्या मते, शहरात केवळ दोन परवानाधारकांना 10 ते 12 बाईक भाड्याने देण्याची परवानगी आहे. मात्र प्रत्यक्षात हेच परवानाधारक 40 ते 50 बाईक रस्त्यावर सोडत आहेत. तसेच अनेकजण कोणतेही परवाने न घेता बेकायदेशीरपणे रेंटल बाईकचा धंदा सुरू ठेवत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे अलिबागमधील पारंपरिक रिक्षा व्यवसायावर संकट ओढावले असून, अनेक रिक्षाचालक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनासाठी माजी उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे आणि शेकाप तालुका प्रमुख सुरेश घरत यांच्या नेतृत्वाखाली रिक्षाचालक प्रतिनिधी मंडळाने अधीक्षक आँचल दलाल तसेच पोलीस निरीक्षक किशोर साळे यांना निवेदन दिले.
या वेळी अलिबाग ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी अफजल सय्यद, अमीन मुल्ला, पप्पू पडावे, शरद राऊत, स्वप्नील नाईक, मन्सूर आगा आणि संदीप म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
निवेदनात रिक्षाचालक संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर बेकायदेशीर रेंटल बाईकवर तातडीने कारवाई झाली नाही तर पुढील काळात मोठं आंदोलन छेडलं जाईल.