प्रतिनिधी : कोकणधारा
रत्नागिरी, दि. २० (जिमाका) : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १९ मार्च २०२६ रोजी मध्यरात्रीपासून ते २ एप्रिल २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१)(३) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केला आहे.
जिल्ह्यात आगामी काळात रमजान ईद (२१ मार्च), श्रीराम नवमी (२६ मार्च), कामदा एकादशी (२९ मार्च), महावीर जयंती (३१ मार्च) आणि हनुमान जयंती (२ एप्रिल) यांसारखे विविध सण-उत्सव साजरे होणार आहेत. यासोबतच विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून आंदोलन, मोर्चे व कार्यक्रमांचे आयोजन होण्याची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
खेड, चिपळूण, अलोरे-शिरगाव, रत्नागिरी, जयगड आणि देवरुख परिसरात औद्योगिक प्रकल्पांमुळे स्थानिकांच्या मागण्यांवरून अचानक आंदोलन होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अपूर्ण कामावरूनही आंदोलन सुरू आहेत. ओबीसी व मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता देखील प्रशासनाने व्यक्त केली आहे.
या आदेशानुसार शस्त्रे, दांडके, तलवारी, बंदुका, स्फोटक किंवा दाहक पदार्थ बाळगणे, दगडफेकसाठी साधने गोळा करणे, भडकावू भाषणे करणे, घोषणा देणे किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी परवानगीशिवाय एकत्र येणे यास मनाई करण्यात आली आहे.
मात्र अंत्ययात्रा, धार्मिक विधी, विवाह सोहळे, सामाजिक कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम तसेच सिनेमागृहे व नाट्यगृहे यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. मोर्चा, मिरवणूक किंवा सभा आयोजित करण्यासाठी संबंधित उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.















