विशेष प्रतिनिधी, कोकणधारा
रत्नागिरी : रत्नागिरीतील स्थानिक कलाकारांच्या हक्काच्या व्यासपीठाची प्रतीक्षा आता संपली असून रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील नूतनीकृत आणि अत्याधुनिक सभागृह स्थानिक कलाकारांसाठी समर्पित करण्यात आले आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्रात शनिवारी रात्री या नूतनीकृत सभागृहाचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला.
उद्घाटन प्रसंगी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांच्या मंगल मंत्रोच्चारात कोनशिलेचे अनावरण व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या बी.ए. परफॉर्मिंग आर्ट्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रा. आनंद आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोककला, भारुड आणि लोकगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. तसेच नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले.
राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या मीनार गजानन पाटील यांचे पालकमंत्री डॉ. सामंत यांनी विशेष कौतुक केले. तसेच प्रा. आनंद आंबेकर आणि डॉ. शशांक पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. उदय सामंत म्हणाले की, “रत्नागिरीत कलाकारांसाठी अत्याधुनिक सभागृहाची गरज होती. ही गरज ओळखून अत्यंत कमी कालावधीत हे सभागृह सज्ज करण्यात आले असून या माध्यमातून रत्नागिरीच्या समृद्ध संस्कृतीला आणि कलाविश्वाला नवे बळ मिळेल.”
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, डॉ. राजश्री देशपांडे, प्राचार्य कीर्तीकुमार भोसले, समीर इंदुलकर, अनिल दांडेकर यांच्यासह नगरसेवक, कलाकार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिनकर मराठे यांनी केले. तसेच पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या कार्याचा गौरव करणारे पद्यरूप गौरवपत्र यावेळी त्यांना प्रदान करण्यात आले.















