प्रतिनिधी : कोकणधारा
राजापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर बेकायदेशीररीत्या पंप बसवून करण्यात येणाऱ्या पाणीचोरीविरोधात राजापूर नगरपालिकेने आक्रमक पवित्रा घेत धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत बेकायदेशीररीत्या बसविण्यात आलेले पाच पंप जप्त करण्यात आले असून, भविष्यातही अशी मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांनी दिली.
शहरामध्ये जलवाहिन्यांद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये काही ठिकाणी बेकायदेशीररीत्या पंप बसवून पाणीचोरी होत असल्याच्या तक्रारी नगरपालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. या प्रकाराला आळा घालण्यासाठी नगरपालिकेने कठोर भूमिका घेतली असून, पाणीचोरी करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता.
त्या अनुषंगाने, पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाने शहरात सर्वेक्षण मोहीम हाती घेतली. या सर्वेक्षणादरम्यान मुख्य जलवाहिनीवर बेकायदेशीररीत्या बसविण्यात आलेले पाच पंप आढळून आले, ते तात्काळ जप्त करण्यात आले. अशा प्रकारची धडक कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील, असा इशाराही श्री. खडपे यांनी दिला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे जलसाठ्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, आगामी काळात शहराला पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता लक्षात घेऊन नगर पालिकेने आतापासूनच उपाययोजनांचे नियोजन सुरू केले आहे.
या पार्श्वभूमीवर विंधन विहिरी, पारंपरिक विहिरी तसेच तळी यांची साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, उन्हाळ्यात नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करता यावा यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही श्री. खडपे यांनी स्पष्ट केले.















