प्रतिनिधी : कोकणधारा
रोहे: रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमाच्या बॅनरवरून पक्षातील प्रमुख नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो गायब झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात आयोजित कार्यक्रमात लावलेल्या बॅनरवर मात्र खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांचेच फोटो झळकले.
हा कार्यक्रम नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कारासाठी आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे स्वतः उपस्थित होते. तरीही पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांचे फोटो बॅनरवर नसल्याने विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
दरम्यान, सुनील तटकरे यांच्यावर यापूर्वीही राष्ट्रवादी पक्षात फूट पाडल्याचे आरोप झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शरद पवार गटाकडून वारंवार करण्यात येत आहे. अशा पार्श्वभूमीवर रायगडमधील या बॅनर प्रकरणाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “दादांचा पक्ष ताब्यात घेण्याचे तटकरेंचे मनसुबे आता उघड झाले आहेत. त्याची सुरुवात रायगडमधून होत आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “हिम्मत असेल तर प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत वेगळा पक्ष काढा किंवा भाजपमध्ये जा,” असा टोला देखील त्यांनी लगावला.
या संपूर्ण प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडकीस येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.















