रायगड | राज्यभरात १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणाऱ्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत रायगड जिल्ह्यातील जिल्हास्तरीय कार्यशाळा कुरुळ येथे पार पडली.
या कार्यशाळेत जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासातील भूमिकेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायत म्हणजे राज्य व केंद्र शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे साधन असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
“समृद्ध पंचायतराज अभियान” सात घटकांवर आधारित असून गावांच्या स्वच्छतेसह जलसमृद्धीसाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहनही करण्यात आले. लोकसहभागातून गावांचा विकास साधल्यास सर्व आघाड्यांवर यश मिळवता येईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, रोहयो मंत्री भरत गोगावले, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे तसेच जिल्हा परिषदेतील विविध खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.