प्रतिनिधी : कोकणधारा
खेड : दापोली विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अस्वस्थतेची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. पक्षाचे खेड तालुकाध्यक्ष स.तु. कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कदम यांनी आपला राजीनामा जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याकडे सादर केला आहे. वैयक्तिक कारणांमुळे पक्षाच्या कामकाजाला अपेक्षित वेळ देता येत नसल्याचे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे. तसेच, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना जबाबदाऱ्या पार पाडण्यात काही अडचणी येत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे.
स.तु. कदम यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटनात्मक पातळीवर मोठे आव्हान उभे राहिल्याचे मानले जात आहे. त्यांच्या कार्यकाळात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने पक्षात एक प्रकारची पोकळी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, मतदार संघातील काही सरपंच आणि स्थानिक पदाधिकारी शिवसेना (शिंदे गट) कडे झुकत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याच पार्श्वभूमीवर पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव तसेच नुकतेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले अजय बिरवटकर यांच्याबाबतही काही कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात नाराजी व्यक्त होत असल्याचे समजते. विशेष म्हणजे, बिरवटकर हे सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय/नातेवाईक असल्याने त्यांच्या विरोधात उघडपणे बोलण्यास अनेक कार्यकर्ते टाळाटाळ करत असल्याचीही चर्चा आहे.
या सर्व घडामोडींमुळे दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटन टिकवणे, नाराज गटांना सांभाळणे आणि कार्यकर्त्यांचा विश्वास पुन्हा मिळवणे हे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आता पक्ष नेतृत्व नव्या तालुकाध्यक्षाची निवड करून परिस्थिती कशी हाताळते आणि अस्वस्थ कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने एकत्र ठेवते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



















