प्रतिनिधी : कोकणधारा
खेड (प्रतिनिधी): रत्नागिरीच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट जगबुडी नदीवरील पुलाच्या संरक्षक कठड्यावर जाऊन आदळल्याची घटना घडली. या अपघातात कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कारचा वेग अधिक असल्याने चालकाचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्यावरून घसरत थेट पुलाच्या कठड्यावर चढली. जर ही कार कठड्यावर अडकली नसती, तर ती थेट सुमारे शंभर ते दीडशे फूट खोल जगबुडी नदीत कोसळली असती.
त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
अपघाताचा आवाज ऐकून इतर वाहनधारक व स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. काही काळासाठी या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता.
घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील वाढता वेग आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.















