अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला.
फडणवीस म्हणाले, “काळजी करू नका, आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे.”
अजित पवार आणि एकनाथ शिंदेसह केंद्रातील अमित शाह यांच्या पाठिंब्याने भरीव मदतीचा आराखडा तयार केला जात आहे.
राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज तयार करण्याचे संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले, “कालच अजित दादा, मी आणि एकनाथ शिंदे बसलो आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यावर चर्चा केली.”
त्याचबरोबर केंद्र सरकारकडूनही मदतीचा शब्द मिळाला असून, फडणवीस म्हणाले, “अमित भाई शाह आमच्या पाठीशी आहेत, त्यांनी सांगितलं — काळजी करू नका, काय लागेल ते केंद्राकडून देऊ.”
या वक्तव्यामुळे लोणीतील उपस्थित शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं.
फडणवीसांनी साखर कारखान्यांवरही टीका केली.
ते म्हणाले, “एफआरपीतील पैसे हे शेतकऱ्याचे आहेत आणि नफ्यातले पैसे कारखान्याचे आहेत. आम्ही एफआरपी नव्हे, नफ्यातून मदत मागितली होती.”
त्यांनी पुढे सांगितले, “शेतकऱ्यांचा काटा मारून पैसे जमा करता, पण त्यांनाच मदत द्यायला दानत नाही.”
फडणवीसांनी स्पष्ट केलं की सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी लढेल आणि कोणालाही शेतकऱ्यांच्या घामावर राजकारण करू देणार नाही.
मुख्यमंत्री म्हणाले, “जे आमच्यावर टीका करतात त्यांनी आधी आरशात बघावं. आम्हाला खुर्च्या तोडण्यासाठी पाठवलेलं नाही, आम्हाला शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी पाठवलं आहे आणि ते केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.”
त्यांनी सांगितले की, उल्हास खोऱ्यातील 54 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणून नगर, नाशिक आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा आराखडा तयार होणार आहे. हा निर्णय राज्याच्या जलसिंचन क्षेत्रात ऐतिहासिक ठरेल, असं त्यांनी नमूद केलं.
फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या कामगिरीचंही कौतुक केलं.
ते म्हणाले, “अमित भाईंनी सहकार क्षेत्राला बळकट करण्यासाठी महाराष्ट्राला 8 ते 10 हजार कोटींचा निधी दिला आहे. त्यांच्या निर्णयांमुळे संस्थांना आर्थिक बळ मिळालं.”














