प्रतिनिधी : कोकणधारा
चिपळूण : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाका येथे पत्रकारांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी, चिपळूण यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे सदर प्रकरणातील सर्व दोषींवर सखोल, निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दि. २५ मार्च २०२५ रोजी घडलेल्या या प्रकारामुळे चिपळूणसारख्या सुसंस्कृत शहरात अशा घटना घडणे अत्यंत अशोभनीय असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पत्रकारांवरील मारहाणीच्या घटनेबाबत गुन्हा दाखल झाल्याचेही यात नमूद करण्यात आले असून, या प्रकरणातील दोषींना योग्य ती शिक्षा व्हावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन (आबू) चंद्रकांत ठसाळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. भविष्यात चिपळूणमध्ये अशा प्रकारच्या घटना घडण्याचे धाडस कोणालाही होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर आणि कायदेशीर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
या वेळी शौकतभाई मुकादम, जयद्रथ खताते, दशरथ दाभोळकर, योगेश पवार, मनोज जाधव, सचिन साडविलकर आदी उपस्थित होते.
पत्रकारांवरील या घटनेनंतर विविध सामाजिक, राजकीय आणि पत्रकार संघटनांकडून निषेध व्यक्त केला जात असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.















