प्रतिनिधी : कोकणधारा
चिपळूण : शहरातील वाशिष्ठी नदीकाठावरील वांगडे मोहल्ला परिसरासाठी अखेर दिलासा देणारा निर्णय झाला असून पूर संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी तब्बल २४ कोटी ९९ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बहादुरशेख पुलापासून वांगडे मोहल्ला पर्यंतचा हा भाग नदीकाठावर वसलेला असून येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. विशेषतः २२ व २३ जुलै २०२१ च्या भीषण पुरात या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून घरांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. तसेच नदीच्या पाण्याच्या वेगामुळे काठालगतची जमीन खचत असल्याने घरांना सतत धोका निर्माण झाला होता.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी मागील तीन वर्षांपासून सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून क्षेत्रीय कार्यालयाच्या पाहणीनंतर तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकास शासनाने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्या अंतर्गत राबविण्यात येणार आहे.
या प्रक्रियेत अप्पर मुख्य सचिव (जलसंपदा) दीपक कपूर, मुख्य अभियंता कपोले, कार्यकारी अभियंता गणेश सलगर व त्यांच्या तांत्रिक पथकाचे मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रकल्पाला गती मिळाली.
दरम्यान, हा केवळ पहिला टप्पा असून पेठमाप स्मशानभूमी ते होळी कट्टा तसेच फरशी पूल ते होळी कट्टा या भागांसाठीही लवकरच मंजुरी मिळविण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या कामामुळे वाशिष्ठी काठावरील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून पूरमुक्त चिपळूणच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री उदय सामंत तसेच संबंधित अधिकारी यांचे आमदार शेखर निकम यांनी आभार मानले आहेत. तसेच दिवंगत अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यात आले आहे.















