प्रतिनिधी : कोकणधारा
रत्नागिरी, दि. १६ (जिमाका) : ऑटोरिक्षा परवाना मिळवताना खोटे कागदपत्र सादर केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येईल. तसेच शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी कारवाईही करण्यात येईल, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात शासकीय धोरणानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत तीनचाकी, तीन आसनी ऑटोरिक्षा परवाने (परमिट) जारी केले जातात. या परवान्यासाठी अर्जदार सरकारी, निमसरकारी, खाजगी कंपनी किंवा संघटित क्षेत्रातील कोणत्याही संस्थेत अथवा उद्योगात नोकरी करत नसावा, अशी अट आहे. यासाठी ऑटोरिक्षा परवाना देताना अर्जदाराकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाते.
मात्र, काही अर्जदारांकडून वरील अटींची पूर्तता होत नसतानाही खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून परवाना मिळविल्याच्या तक्रारी कार्यालयास प्राप्त होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर कार्यालयामार्फत ५० हून अधिक परवाना निलंबनाच्या अनुषंगाने नोटिसा बजावण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने दोषींवर कारवाई करण्यात येत आहे.
ऑटोरिक्षा परवान्यासाठी अर्ज करताना इच्छुकांनी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या शासन निर्णय क्रमांक एमव्हीआर ०८१५/प्र.क्र. ३८७ / परि-२, दिनांक १८ जुलै २०१७ मधील अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे.



















