अलिबाग | राज्यातील धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीच्या आरक्षणात वाटा मागण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील कोळी व आदिवासी समाज आक्रमक झाला असून येत्या 30 सप्टेंबर रोजी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे.
शनिवारी (20 सप्टेंबर) अलिबाग येथे झालेल्या संयुक्त बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. बैठकीत आरक्षणाच्या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणात कुणालाही वाटेकरी होऊ देणार नाही, असा ठाम पवित्रा नेत्यांनी मांडला.
जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचे माजी सभापती दिलीप भोईर म्हणाले, “आमचा कुणालाही आरक्षण द्यायला विरोध नाही. परंतु आमच्या हक्काच्या जागेत कुणी डोकावलं, तर ते आम्ही सहन करणार नाही. आधीच आदिवासी व कोळी बांधव अनेक समस्यांचा सामना करीत आहेत. अशा वेळी आमच्या ताटात हात घालण्याचा प्रयत्न आम्ही रोखून धरू.”
बैठकीला माजी तहसीलदार मोरेश्वर आडके अध्यक्षस्थानी होते. यावेळी आदिवासी कातकरी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान नाईक, माजी तहसीलदार रवी पाटील, ऑफ्रोह संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष जलदीप तांडेल, धर्मा लोभी, गजानन पाटील आदींसह अनेक समाजनेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी गावोगावी बैठका घेऊन समाजबांधवांना एकत्र करण्याचं ठरलं आहे. स्वतंत्र समित्या स्थापन करून नियोजन सुरू करण्यात आलं आहे. या आंदोलनातून कोळी व आदिवासी समाजाने सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे की, अनुसूचित जमातीच्या आरक्षणावर कुणाचाही डोळा असू नये.