मुंबईत 2 ऑक्टोबर रोजी झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या गटाला धक्का देत माजी आमदार राजन तेली यांनी शिंदे गटात प्रवेश केला. गेल्या वर्षी ठाकरे गटात दाखल झालेले तेली यांचा अचानक निर्णय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील कर्ज फसवणूक प्रकरणातील कारवाईपासून वाचण्यासाठी हा प्रवेश असल्याची चर्चा रंगली आहे.
राजन तेलींच्या गटबदलामागे बँक प्रकरण?
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणी राजन तेलींसह आठ जणांविरोधात तक्रार दाखल झाली होती. मुंबईतील सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात तेली यांचे कुटुंबीय आणि इतर संबंधितांची नावं समोर आली आहेत.
प्रथमेश राजन तेली
सर्वेश राजन तेली
प्रदीप केरकर
शैलजा सिंगबाळ
सीमा सबनीस
राजन कृष्णा तेली
रुजिता राजन तेली
सुनील निरवडेकर
या प्रकरणाची दडपशाही टाळण्यासाठी शिंदे गटात दाखल झाल्याची चर्चा सिंधुदुर्गात रंगली आहे.
राजन तेली व दीपक केसरकर : दशकभराची राजकीय लढत
राजन तेली यांनी अनेक वर्षं सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकरांना कडवी झुंज दिली.
2014 निवडणूक : केसरकर (70,902 मते) यांनी भाजप उमेदवार तेली (29,710 मते) यांचा मोठा पराभव केला.
2019 निवडणूक : युतीतून केसरकर पुन्हा विजयी (69,784 मते) तर अपक्ष तेली (56,556 मते) दुसऱ्या क्रमांकावर.
सावंतवाडीत तीन वेळा सलग विजय मिळवून केसरकरांनी आपलं वर्चस्व टिकवलं असलं तरी तेली यांनी कायम आव्हान दिलं.
राजन तेलींचा राजकीय प्रवास अनेक वळणांनी भरलेला आहे. 1985 साली विद्यार्थी सेनेतून सुरुवात करून 1988 साली शिवसेना शाखाप्रमुख झाले. 1991 मध्ये जिल्हाप्रमुख आणि पुढे जिल्हा परिषद अध्यक्ष पद भूषवले. 1997 मध्ये कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली.
2005 मध्ये राणे कुटुंबीयांसोबत शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2007 मध्ये विधान परिषद सदस्य झाले. 2012 मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन पद भूषवले. पुढे भाजपमध्ये प्रवेश करून 2016 साली राज्य सचिव आणि 2020 साली जिल्हाध्यक्ष पद भूषवले.
गेल्यावर्षी ठाकरे गटात दाखल होताना तेलींनी सिंधुदुर्गातील राणे कुटुंबीयांवर टीका केली होती. पण अवघ्या वर्षभरातच त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. दसऱ्याच्या दिवशी शिंदे गटात दाखल झाल्याने सिंधुदुर्गातील राजकारणात नवा पेच निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, बँक प्रकरणातील आरोपांच्या पार्श्वभूमीवर तेलींचा शिंदे गटात प्रवेश “सुरक्षेचं कवच” म्हणून पाहिला जातोय. मात्र, त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) साठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
राजन तेलींच्या शिंदे गटात प्रवेशामुळे सिंधुदुर्गातील राजकारण नव्या वळणावर आलं आहे. उद्धव ठाकरे यांना सोडून त्यांनी घेतलेला हा निर्णय बँक प्रकरणातील आरोपांच्या पार्श्वभूमीवर अधिक चर्चेत आहे. यामुळे स्थानिक राजकारणात केसरकर-तेली यांची स्पर्धा नव्या रंगात सुरू राहणार असल्याचं स्पष्ट होतं.














