मुंबई | राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता वितरित करण्यात आला. या अंतर्गत 91 लाख 65 हजार 156 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1892.61 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घेतलेल्या या निर्णयासोबतच मंत्रिमंडळ बैठकीत आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
🟢 शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत
उपसा जलसिंचन योजनांना पुढील दोन वर्षांसाठी वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वीजदर सवलत योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
🟢 पायाभूत सुविधा विकासासाठी कर्ज
नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेत हुडकोकडून दोन हजार कोटींचे कर्ज घेण्यात येणार आहे. यामधून छत्रपती संभाजीनगरला 822 कोटी, नागपूरला 268 कोटी, तर मीरा-भाईंदरला 116 कोटींचा निधी मिळणार आहे.
🟢 लघुपाटबंधारे योजनांची दुरुस्ती
अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कानडी लघुपाटबंधारे योजनांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी घोंगासाठी 4 कोटी 76 लाख, तर कानडीसाठी 4 कोटी 92 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
🟢 इंटेलिजन्स ब्युरोसाठी जमीन
केंद्र सरकारच्या इंटेलिजन्स ब्युरोला आसुडगाव–पनवेल येथील जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.














