मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना दिलासा; सुधारित कार्यपद्धतीमुळे वेगवान मदत वितरण
रत्नागिरी, दि. २१ : शासनाच्या विविध आरोग्य योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी महत्त्वाचा आधार ठरत आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ३९० रुग्णांना सुमारे ३ कोटी ७ लाख ६४ हजार रुपयांची वैद्यकीय मदत वितरित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून या निधीच्या कार्यपद्धतीत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जांचा निपटारा यांसारख्या उपाययोजनांमुळे पारदर्शकता वाढली असून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. तसेच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आणि सामाजिक दायित्व (CSR) माध्यमातून विविध संस्था, धर्मादाय रुग्णालये व दाते यांचे सहकार्य मिळत आहे.
या निधीतून कॉक्लियर इम्प्लांट, हृदय, किडनी, यकृत, फुफ्फुस प्रत्यारोपण, कर्करोग उपचार, अपघातग्रस्त रुग्ण, बालकांच्या शस्त्रक्रिया, डायालिसिस आदी सुमारे २० गंभीर आजारांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
बालकांच्या कर्करोग उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला असून, या माध्यमातून CSR अंतर्गत विशेष निधी उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, राज्यात १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख रुपयांहून अधिक मदत देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी व सहाय्यासाठी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.














