माणुसकीचा जिवंत प्रत्यय: चांदसूर्या स्टॉपजवळ अपघात; रिक्षाचालक आदित्य पावसकर यांची तत्परता ठरली जीवदान देणारी
रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील चांदसूर्या स्टॉपजवळ गुरुवार, 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11.30 वा.सुमारास झालेल्या वाहन अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. मात्र, प्रसंगावधान राखत रिक्षाचालकांनी दाखविलेल्या धाडस आणि तत्परतेमुळे जखमीला वेळेत उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचण्यास मदत झाली आहे.
जयसूर्या शांताराम मांडवकर (वय 38, रा. कापडगाव) हे अपघातात गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत होते. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने परिसरात नागरिकांची गर्दी जमली होती. मात्र, या गंभीर परिस्थितीत वेळ न दवडता रिक्षाचालक आदित्य अनंत पावसकर (रा. गावडे आंबोरे) यांनी माणुसकीचा परिचय देत तातडीने पुढाकार घेतला. पावसकर हे आपल्या रिक्षाचे पासिंग काम आटोपून रत्नागिरीत परतत होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जखमी मांडवकर यांना आपल्या रिक्षामध्ये घेतले. यावेळी रुपेश पालकर (रा. पाली) यांनीही तत्पर सहकार्य करत आपली दुचाकी तिथेच उभी करून रिक्षामधून जखमी मांडवकर यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. जखमी मांडवकर यांच्यावर अती दक्षता विभागात उपचार सुरू आहेत.आदित्य पावसकर या रिक्षाचालकानी दाखविलेल्या धाडसी आणि मानवतावादी कृतीमुळे रत्नागिरीत त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.















