रत्नागिरी : रत्नदुर्ग किल्ला परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या चौघांना रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी सायंकाळी छापा टाकून ही कारवाई करण्यात आली असून, पुढेही अशा कारवाया नियमित सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून किल्ले रत्नदुर्ग तसेच भगवती बंदर पेठ परिसरात सायंकाळी मद्यपींचा वावर वाढल्याच्या तक्रारी येत होत्या. यामुळे सहलीसाठी येणाऱ्या कुटुंबियांना व पर्यटकांना त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई केली.
छाप्यामध्ये काही तरुण सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत धिंगाणा घालताना आढळले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक तानाजी पवार, परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक सिद्धी सावंत, उपनिरीक्षक सागर वाळुंजकर तसेच हेडकॉन्स्टेबल पंकज पडेलकर, प्रवीण पाटील, कुशल हातिसकर आणि रोहन गमरे यांनी केली.















