konkandhara.com

  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारणाआधी राष्ट्रकर्तव्य; शिंदेंकडून सैन्याला 50 कंटेनर मदत
Image

राजकारणाआधी राष्ट्रकर्तव्य; शिंदेंकडून सैन्याला 50 कंटेनर मदत

उरण | १० जानेवारी २०२६ :
राज्यात सध्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचारसभा, आरोप-प्रत्यारोप आणि सत्तासंघर्षाच्या या गदारोळातही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकारणापेक्षा राष्ट्रकर्तव्याला प्राधान्य देत भारतीय सैन्याप्रती आपली बांधिलकी जपल्याचे चित्र समोर आले आहे. सीमेवर तैनात असलेल्या जवानांचे शत्रूच्या हल्ल्यांपासून तसेच बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे, या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने तब्बल ५० कंटेनर भारतीय सैन्यदल यांना सुपूर्द करण्यात आले आहेत. ही मदत प्रत्यक्ष सीमेवरील जवानांसाठी एक महत्त्वपूर्ण सुरक्षा कवच ठरणार आहे.

देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांच्या गरजा केवळ शासकीय चौकटीतच नव्हे, तर सामाजिक आणि राजकीय पातळीवरही समजून घेणे गरजेचे असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. निवडणुकीच्या धामधुमीतही अशा प्रकारचा पुढाकार घेतल्याने या निर्णयाकडे सर्वत्र लक्ष वेधले गेले आहे.

सैन्यदलाची मागणी आणि शिंदेंचा तात्काळ पुढाकार

या उपक्रमामागची पार्श्वभूमी काही महिन्यांपूर्वीची आहे. १० ऑगस्ट २०२५ रोजी शिवसेनेच्या वतीने ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ जम्मू-काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आली होती. या यात्रेदरम्यान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील सुमारे १,००० पैलवानांनी भारतीय जवानांसाठी रक्तदान केले होते. विशेष बाब म्हणजे, खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रक्तदान करत जवानांचा उत्साह वाढवला होता.

याच भेटीदरम्यान भारतीय सैन्यदलाचे ब्रिगेडियर युद्धवीर सिंह सीखों यांनी सीमेवरील जवानांच्या सुरक्षिततेसाठी कंटेनर उपलब्ध करून देण्याची विनंती शिंदे यांच्याकडे केली होती. सीमेवरील परिस्थिती, वाढते तांत्रिक धोके आणि जवानांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन शिंदे यांनी ही मागणी तत्काळ मान्य केली. “जवान सुरक्षित असतील, तर देश सुरक्षित राहील,” या भावनेतून त्यांनी ५० कंटेनर देण्याचा शब्द दिला होता, जो आता प्रत्यक्षात उतरलेला दिसत आहे.

ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर कंटेनरचे महत्त्व

‘ऑपरेशन सिन्दुर’नंतर भारत-पाकिस्तान सीमारेषेवरील युद्धतंत्रात मोठे बदल झाले आहेत. पारंपरिक गोळीबारासोबतच आता ड्रोनच्या माध्यमातून हल्ले, टेहळणी आणि गुप्त हालचालींचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अशा परिस्थितीत उघड्यावर तैनात असलेल्या जवानांसाठी सुरक्षित आश्रयस्थाने उपलब्ध करून देणे ही मोठी गरज बनली आहे.

सीमेवर कायमस्वरूपी सिमेंट-काँक्रीट बंकर उभारणे अनेक ठिकाणी तांत्रिक आणि भौगोलिक कारणांमुळे कठीण ठरते. यावर उपाय म्हणून कंटेनरचा वापर करून जलदगतीने बंकर उभारता येतात. या कंटेनरमध्ये सैनिक, अत्याधुनिक शस्त्रसाठा, दळणवळण साधने तसेच महत्त्वाचे साहित्य सुरक्षित ठेवता येते. याशिवाय, तीव्र थंडी, पाऊस, बर्फवृष्टी आणि उष्णतेपासूनही संरक्षण मिळते. त्यामुळे शिंदे यांच्या पुढाकारातून देण्यात आलेले कंटेनर हे केवळ मदत नसून, जवानांच्या दैनंदिन सुरक्षेचा एक महत्त्वाचा भाग ठरणार आहेत.

उरणमधून शेवटची तुकडी रवाना

या ५० कंटेनरपैकी ४६ कंटेनर यापूर्वीच सीमावर्ती भागात पाठवण्यात आले होते. उर्वरित चार कंटेनर आज रायगड जिल्ह्यातील उरण येथून भारतीय सैन्यदलाच्या ताब्यात देण्यात आले. युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांनी या कामासाठी विशेष पुढाकार घेतला होता.

त्यांच्या उपस्थितीत सैन्यदलाचे अधिकारी सुभेदार सयाजी निगडे आणि नायक सुभेदार आनंद गायकवाड यांनी हे कंटेनर स्वीकारले. विशेष म्हणजे, हे कंटेनर स्वखर्चाने सीमावर्ती भागात नेण्याची तयारी सैन्यदलाने दर्शवली आहे. तत्काळ मदत आणि सहकार्य मिळाल्याबद्दल भारतीय सैन्यदलाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे आभार मानले आहेत.

निवडणुकीच्या राजकारणात अडकून न पडता, राष्ट्रीय सुरक्षेसाठी प्रत्यक्ष योगदान देण्याचा हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. सैनिकांच्या सुरक्षिततेसाठी उचललेले प्रत्येक पाऊल हे देशाच्या सुरक्षिततेकडे टाकलेले पाऊल असते. राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याची ही भूमिका समाजासाठीही एक सकारात्मक संदेश देणारी ठरत आहे.

✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

Releated Posts

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; सरकारकडून सकारात्मक आश्वासनानंतर निर्णय

मुंबई : सुधारीत निवृत्ती वेतन योजनेसह विविध १८ मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला…

ByByEditorial अप्रैल 26, 2026

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे,

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई :दि .23 :महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून,…

ByByEditorial मार्च 23, 2026

१७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये २७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली…

ByByEditorial मार्च 13, 2026

व्यावसायिक गॅस टंचाईमुळे हॉस्टेल-पीजी, हॉटेल व्यवसाय अडचणीत, अभिनेता हेमंत ढोमे यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : बाजारात व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे हॉस्टेल्स, पेइंग गेस्ट (PG) व्यवस्था आणि हॉटेल…

ByByEditorial मार्च 11, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे