खेड : तालुक्यातील कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासनिक निष्क्रियतेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रुग्णालयातील जनरेटर सुरू न झाल्याने पोस्टमार्टमसाठी आणलेला मृतदेह तब्बल तीन तास अंधारात पडून राहिल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी रात्री तळवट पाली येथून मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला होता. त्याचवेळी वीजपुरवठा खंडित झाला. रुग्णालयात दोन जनरेटर असतानाही एक बंद अवस्थेत होता, तर दुसऱ्यासाठी डिझेल उपलब्ध नसल्याने तोही सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे संपूर्ण रुग्णालय अंधारात बुडाले.
या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्याचवेळी आपत्कालीन शस्त्रक्रिया किंवा प्रसूतीची वेळ आली असती, तर रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता, अशी भीती व्यक्त होत आहे.
घटनेनंतर नागरिक आणि सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. ‘उपजिल्हा रुग्णालय’ हे केवळ नावापुरतेच उरले आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.















