दोडामार्ग : भूषण सावंत : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांवर यंदा उष्णतेचा मोठा फटका बसत असताना, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. मार्च महिन्यात तापमानाने ३७ अंशांचा टप्पा ओलांडला, मात्र जिल्ह्यातील अनेक भागांत तापमान नोंदविण्यासाठी आवश्यक यंत्रणाच नसल्याने प्रत्यक्ष परिस्थितीची नोंदच होत नसल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना होणारे नुकसान शासनापर्यंत पोहोचत नाही. परिणामी, नुकसानभरपाईपासूनही शेतकरी वंचित राहत आहेत. “तक्रारी करूनही प्रशासन झोपेतच आहे का ?” असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
दरम्यान, एप्रिलमध्ये तापमान ४० अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता असताना, फळपिकांवर त्याचा गंभीर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. आंबा व काजू पिकांची मोठ्या प्रमाणावर गळती होत असून, अनेक ठिकाणी फळधारणा कमी झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तरीही अधिकृत तापमान नोंदीअभावी या नुकसानीची दखल घेतली जात नसल्याचे वास्तव आहे.
शासनाने फळपिक विमा योजना लागू केली असली तरी, त्यातील तांत्रिक अडचणी व निकषांमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नाही. विमा कंपन्या व शासन यांच्यातील विसंगतीमुळे नुकसानभरपाई वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
“तापमान नोंदविण्याची यंत्रणा तात्काळ बसवावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी आणि विमा योजनेतील त्रुटी दूर कराव्यात,” अशी ठाम मागणी वेंगुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष व शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
👉 निष्क्रिय प्रशासनामुळे शेतकऱ्यांच्या जिवावर बेतलेली परिस्थिती आता किती दिवस सहन करायची ?















