दोडामार्ग : भूषण सावंत : पंचायत समितीची मासिक सभा सभापती पार्वती गवस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. मात्र या सभेत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. विविध विभागांची रखडलेली कामे, वारंवार सूचना देऊनही कोणतीच ठोस हालचाल न झाल्याने सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला.
विशेष म्हणजे अनेक महत्त्वाच्या खात्यांचे प्रमुख अधिकारी बैठकीला गैरहजर राहिल्याने संताप आणखी वाढला. “जनतेच्या प्रश्नांकडे इतकी बेफिकिरी का?” असा थेट सवाल करत सदस्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले. रखडलेल्या कामांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना संबंधित अधिकारी मात्र जबाबदारीपासून पळ काढत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
या बैठकीत उपसभापती गणेशप्रसाद गवस, सदस्य संजय सातार्डेकर, स्नेहा गवस, सायली निंबाळकर, सोनिया कुबल तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत गवस उपस्थित होते. सदस्यांनी एकमुखाने प्रशासनाला इशारा देत, “यापुढे कामात दिरंगाई सहन केली जाणार नाही,” असा ठाम इशारा दिला.
सभागृहात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता तरी संबंधित विभाग जागे होणार का, की जनतेचा संताप आणखी भडकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















